Showing posts with label पुस्तक. Show all posts
Showing posts with label पुस्तक. Show all posts

Thursday, March 20

'समुद्रापारचे समाज' विषयी

विकासाच्या आणि समृद्धीच्या पारंपारिक कल्पना, जागतिकीकरण, जातीभेद अशा अनेक विषयांबाबतचे आपले पूर्वग्रह अतिशय बळकट असतात त्यामुळे काही गोष्टी दिसत असूनही आपण न पाहिल्यासारखे करतो तर कधीकधी 'मोडेन पण वाकणार नाही' अशा दुराग्रही निगरगट्टपणाने त्यांचे समर्थन करत राहतो. कारण कोणीतरी आपल्या पूर्वग्रहांना गदगदा हालवावे, विचार करण्याची पद्धतच बदलवून टाकावी असे शक्यतो होत नाही. बोकीलांचे 'समुद्रापारचे समाज' हे पुस्तक वाचले आणि एक नवी दृष्टी लाभल्यासारखे झाले. मनाची जळमटलेली कवाडे खुली होऊन मोकळा श्वास घेता येत आहे असे वाटू लागले.

'समुद्रापारचे समाज' विषयी खूप वाचले होते. मात्र बरेच दिवस ते पुस्तक मिळाले नाही. पुण्यातील एका दुकानदाराने तर ते ’मुंबईच्या प्रकाशनाचे पुस्तक आहे. आणि आम्ही त्यांची पुस्तके विकत नाही.’ असे सांगून मला वाटेला लावले होते. पण शेवटी एका प्रदर्शनात ते गावलेच. ;)

पुस्तकाविषयी काही सांगण्याआधी बोकीलांविषयी थोडेसे सांगणे आवश्यक आहे. बोकील यांचे शिक्षण मुळात इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनीअरिंग या विषयातले. असे असले तरी तरूणवयात काही आंदोलनांशी संबंध आल्यावर त्यांना समाजशास्त्राचा आणि मानववंशशास्त्राचा विद्यापीठीय चौकटीत अभ्यास करण्याची प्रेरणा निर्माण झाली. या अभ्यासाने त्यांच्या एकूणच लेखनाला प्रगल्भ आणि शास्त्रीय समज प्राप्त झाली आहे. याचबरोबर त्यांची जडणघडण वैचारिक आंदोलनांमध्ये झालेली असल्याने त्यांच्या कोणत्याच लेखनात केवळ शास्त्रीय कोरडेपणा नसतो तर त्या प्रश्नाची मुळापासून आस्था असल्याने त्या प्रश्नाशी असलेली त्यांची बांधीलकी त्या लेखामध्ये जाणवत राहते.

या पुस्तकात बोकील यांनी दुर्लक्षित परदेशीय समाजांच्या जीवनाबद्दल वेगवेगळ्या दिवाळी अंकात लिहिलेले लेख संकलित केलेले आहेत. दिवाळी अंकात येणार्‍या नेहमीच्या पद्धतीच्या लेखांपेक्षा हे लेख अतिशय वेगळ्या प्रकारचे आहेत. बोकीलांची समाजजीवनाकडे, समृद्धीकडे, भौतिक प्रगतीकडे पाहण्याची वेगळी दृष्टी, त्याला पूरक असा त्यांचा मानववंशशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि अतिशय सुंदर भाषाशैली यामुळे हे लेख अभ्यासपूर्ण असले तरी बोजड नाहीत.

फिलिपीन्सच्या उत्तरेकडच्या इफूगाओ प्रांतातले आदिवासी , समाजकार्य करणारा बैरॉईटमधील एक समूह, अमेरिकेच्या वळचणीला वसलेला लहानसा कोस्टा रिका, ऍमस्टरडॅम आणि थायलंडमधील देहविक्री करणारे व्यावसायिक, वर्णभेदाने दुभंगलेला झिम्बाब्वे आणि जपानमधले दलित. अशी लेखांच्या विषयात विविधता असली तरी प्रत्येक लेखातून एक समाजशास्त्रीय समान तत्त्व काढण्याच्या उद्देशाने त्यांनी त्या त्या प्रदेशातील परिस्थितीची तुलना भारतातील परिस्थितीशीही केली आहे. त्यामुळे हे लेख समजायला सोपे तर जातातच शिवाय ते मनाला भिडतातही.

पुस्तकातील काही लेखांमधून आदिवासी समजल्या जाणार्‍या समूहांच्या जीवनशैलीशी ओळख होऊ लागते. आपण ज्यांना आदिवासी किंवा तथाकथित मागास समजतो अशा समूहांची जगभरातील जीवनपद्धती किती समृद्ध आहे. हवा-पाणी-जमीन यांवर कमीतकमी अत्याचार होतील अशा पद्धतीने एकमेकांस मदत करून सुसंस्कृत जीवन जगण्याची त्यांची धडपड चालूच आहे. बाहेरच्या जीवघेण्या स्पर्धेला, त्यांच्यावर होणार्‍या सांस्कृतिक आक्रमणाला तोंड देतानाही या समूहांनी शांततामय जीवनाचा मार्ग सोडलेला नाही. या पार्श्वभूमीवर ज्याला आपण प्रगत समाज म्हणतो अशा समाजातील असंस्कृतपणा, ओरबाडून घेण्याची वृत्ती, स्वार्थीपणा ह्या गोष्टी बटबटीतपणे पुढे येऊ लागतात.

पुस्तकातील ऍमस्टरडॅम आणि अमेझिंग थायलंड या लेखांमधून लैंगिक व्यवसायांसाठी प्रसिद्ध असणार्‍या या पर्यटनस्थळांमध्ये चाललेल्या लैंगिक शोषणाबद्दल बोकीलांनी लिहिले आहे. या व्यवसायात एकूणच जीवनव्यवहाराचा प्रत्येक भाग असलेली गोष्ट 'खरेदी-विक्री करून पैका करण्याची वस्तू' मानणे. मानवी शरीराला पशूपेक्षाही हीन पातळीवर उभे करून या सर्व गोष्टींचा बाजार 'आधुनिक समाज' या नावाखाली चालवणे या गोष्टी पाहून बोकील अस्वस्थ होतात.

कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय समाज अशी वर्णभेदी व्यवस्था हे खरे तर युरोपियन वसाहतवादाचे फळ. अगदी कालपरवा प्रसिद्ध झालेल्या नॅशनल जिओग्राफिकच्या लेखामध्येही हेच अधोरेखित केले आहे. 'झिम्बाब्वे काळा की गोरा' आणि 'जपानमधील दलित' या लेखांमध्ये हीन समजल्या जाणार्‍या समाजघटकांबद्दल बोकीलांनी लिहिले आहे. कोणताही घटक समाजव्यवस्थेमध्ये हीन कसा ठरत जातो हे उलगडून सांगतानाच ही हीन ठरवण्याची पद्धत स्थल-काल-संस्कृतीनिरपेक्ष - अगदी सर्वत्र - सारखीच कशी आहे हेदेखील बोकील अधोरेखित करतात. एकदा एखाद्या समूहाला हीन ठरवले की नंतर त्या समूहाच्या प्रगतीच्या वाटा बंद करण्याच्या पद्धतीही सर्वत्र कशा सारख्याच आहेत हे देखील बोकील विस्ताराने समजावून सांगतात.

प्रत्येक लेख त्या त्या विषयाचा बोकीलांनी केलेल्या अभ्यासाची खात्री तर पटवतोच पण वाचकालाही अस्वस्थ करून सोडतो. 'मानवी समाजातील प्रकृती आणि विकृतीच्या कल्पना बदलत असतात' अशी बोकीलांची मार्मिक निरीक्षणे दाद घेऊन जातात. पुस्तकातील लेखन केवळ प्रवासवर्णनात्मक किंवा मनोरंजनात्मक उद्देशाने केलेले नाही. ह्या प्रवासात बोकीलांना आलेले अनुभव सांगतानाच त्या अनुभवांमागची कारणे मानववंशशास्त्रीय शोधण्याचाही बोकीलांचा प्रयत्न असतो.

वसंत पळशीकर यांची पुस्तकाला लाभलेली प्रस्तावना हा तर एका वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल. अनेक पुस्तकांच्या प्रस्तावना या ऋणनिर्देश, अर्पणपत्रिकेची पुरवणी पत्रिका इतक्याच मर्यादेत जातात, किंवा त्याचा उपयोग प्रस्तावना लिहिणारे लेखक समीक्षकी भाषेत त्यांचे ज्ञान 'मी कित्ती हुश्शार' पद्धतीने स्वतःभोवती आरती ओवाळण्यासाठी वापरतात. या पुस्तकाची प्रस्तावना मात्र लेखांप्रमाणेच वारंवार वाचावी, समजून घ्यावी अशी आहे.

शेवटी प्रस्तावनेतील काही भाग:

"ज्या व्यवस्थेत माणसाचा आत्मसन्मान,, त्याची प्रतिष्ठा या गोष्टी राखल्या जातात, माणुसकी जपली व संवर्धित केली जाते, स्त्री पुरुष हा भेद विषमतेसाठी, शोषणासाठी केला जात नाही, जेथे व्यक्ती स्वतंत्र व समान आहे, जेथे पृथ्वीच्या पर्यावरणीय व्यवस्थेचा आदर केला जातो, पर्यावरणाची जपणूक व संवर्धन केले जाते, जेथे मानवी लोकसमूहांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली व संस्कृतींना सन्मानपूर्वक अवकाश राहिलेला असेल आणि जेथे माणसांमाणसांमधली नाती ही बंधुभावाची, आत्मीयतेची, एकमेका साह्य करण्याची असतील अशा एका नवसमाजाच्या निर्माणाचे ध्येय बोकील बाळगतात.हा त्यांचा पक्ष आहे. या अर्थाने आर्थिक विकास, प्रगती, आधुनिकता, समृद्धी यांची आज जी शिष्टमान्य प्रतिमाने वा धारणा आहेत त्यांना विकल्प शोधण्याच्या, निर्माण करण्याच्या, हे विकल्प रुजविण्याच्या पक्षातले ते आहेत. आर्थिक विकास, प्रगती, आधुनिकता, समृद्धी या सगळ्यांच्या परिणामी माणसांचे काय होते, जास्त सुसंस्कृत, प्रेमळ, नि:स्वार्थी, स्वस्थ, माणुसकीसंपन्न बनून एकमेकांशी ती नाती जोडतात की नाही हीच खरी मापनकसोटी आहे ही त्यांची धारणा असल्याचे लेखांमधून प्रकट होत राहते.

वाचकाचे मनोविश्व तसेच विचारविश्व समृद्ध व सखोल बनविणारे हे लेख ही वैचारिक साहित्यात एक मोलाची भर आहे."

Tuesday, December 4

पालखी

दि.बा.मोकाशींच्या कथा काही वाचकांना परिचित असल्या तरी त्यांचे लेखन म्हणावे तितके प्रसिद्ध झाले नाही. त्यांच्या कथांकडे झालेले दुर्लक्ष पाहता त्यांनी प्रवासवर्णनांमध्ये केलेली मुशाफिरी मात्र उपेक्षितच राहिली आहे या बाबीचा खेद वाटला तरी आश्चर्य वाटत नाही. पुण्यापासून पंढरपूरपर्यंत वारकर्‍यांसोबत केलेल्या वारीची मोकाशींच्या अनोख्या शैलीतील "पालखी" ही "वाचलेच पाहिजे असे काही" प्रकारातील नोंद.

खरे म्हणजे "पालखी"च्या पार्श्वभूमीवर एखादी कादंबरी लिहावी अशी मोकाशींची फार इच्छा. त्यांच्या कल्पनेतल्या कादंबरीतील एका वारकर्‍याच्या डॉक्टर मुलाला, वडिलांच्याऐवजी, वारीला जावं लागतं. पालखी सुरू होते तेव्हा कादंबरी सुरू होते आणि पालखीबरोबरच ती संपते. ही कादंबरी लिहिणे मोकाशींना शक्य झाले नाही. मात्र पालखीबाबतचे आकर्षण मनात मात्र कायम राहिले. एक महिना व्यवसाय बंद करून, महिन्याभरासाठी संसाराची रक्कम व पालखीबरोबरचा खर्च यांची तरतूद करून जावे लागेल या कारणाने काही वर्षे पालखीला जाण्याचे त्यांनी टाळले. मोकाशींच्याच भाषेत सांगायचे तर "यंदा तगमग अतिशय वाढली. काळे ढग आले. पाऊस कोसळू लागला. हवा कुंद झाली. वारकरी दिसू लागले. एके दिवशी लौकर दुकान बंद करून घरी आलो आणि जाहीर केलं - काही झालं तरी यंदा पालखीला जाणार!"


मोकाशी रूढ अर्थाने वारकरी किंवा भक्त नव्हेत. किंबहुना वारी किंवा तीर्थक्षेत्रेच नव्हे तर समाजात सर्वच ठिकाणी चालणार्‍या अनिष्ट प्रथांबाबतची नाराजी त्यांनी त्यांच्या कथांमधून सौम्य रीतीने व्यक्त केली आहे. त्यांच्या कथांमधूनही त्यांची पुरोगामी वैज्ञानिक दृष्टी ठळकपणे दिसते. ही वारी करण्याची कल्पना पालखीची आकडेवारी काढावी अशी होती. वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व थरांतले व प्रांतातले लोक एकत्र येतात. त्यांना दिलेल्या प्रश्नावलीच्या उत्तरांमधून समाजाचाच एक आरसा दिसेल अशी मोकाशींची कल्पना. वारीसोबत जाणार्‍या चिवडा विकणारे, केशकर्तन करणारे, बांगड्या विकणारे यांसोबतच आपला व्यवसाय वारीच्या निमित्ताने चालू ठेवण्याचे ठरवत मोकाशी वारीत सामील झाले.

हातात प्रश्नावलींचे कागद व गळ्यात कॅमेरा लटकवल्याने इतर वारकर्‍यांपेक्षा वेगळ्या दिसणार्‍या मोकाशींना आपल्या शांत,सौम्य,प्रसन्न व सात्त्विक व्यक्तिमत्त्वाने अनेक वारकर्‍यांशी खुलून संवाद साधता आला. प्रश्नावली बाजूला ठेवून सुपारी-तंबाखूच्या साथीने मोकाशींनी वारकर्‍यांशी मारलेल्या गप्पांमधून वारीचे अंतरंग प्रकट झाले आहेत. वारीमध्ये परमेश्वराच्या दर्शनासाठी येणारे वारकरी आपल्या सांसरिक व्यथा चिंता सोबत वागवत येतात हे मोकाशींना खटकते. मात्र वारीच्या कालावधीतच पुराने थैमान घातलेल्या पुण्याची बातमी कळताच कुटुंबाची काळजी वाटून पुण्याकडे परत धाव घेतल्याचे मोकाशी प्रांजळपणे मान्य करतात. घरच्या माणसांना "धडा शिकवण्याच्या" उद्देशाने पालखीत येणारे वारकरी इथे आहेत तर पालखीच्या वाटेवरच देह ठेवण्याचा निश्चय करणारे नव्वद वर्षे ओलांडलेले काही वारकरी इथे आहेत.


दीडशे मैलाच्या पायपिटीतील सासवड-जेजुरी-वाल्हे-लोणंद-पुणे-फलटण-बरडगाव-नातेपुते-माळशिरस-वेळापूर-शेगाव-वाखरी-पंढरपूर अशा प्रत्येक मुकामाच्या ठिकाणी मोकाशींना आलेले अनुभव, त्रयस्थ दृष्टीकोणातून वारीकडे पाहत त्यांनी केलेली टिपणे, लहानसहान प्रसंगात पालखीतील वारकर्‍यांच्या वर्तणुकीचे अर्थ लावण्याचे त्यांचे कौशल्य "पालखी" मध्ये प्रतिबिंबित झाले आहे.


शेगाव येईपर्यंत वारीमध्ये आलेल्या अनुभवांवरूनही वारकर्‍यांप्रती असलेली मनाची ओल कायम ठेवणार्‍या मोकाशींच्या मनातील वारकर्‍याच्या प्रतिमेला शेगावमधील लाह्यांच्या व फुगडीच्या प्रसंगानंतर खरा धक्का बसतो. वाखरीमध्ये भेटलेला एक म्हातारा या भंग झालेल्या प्रतिमेला अधोरेखित करणारी संत तुकारामांची कथा त्यांना सांगतो आणि आयुष्याबद्दल तारतम्य आलेल्या एका खर्‍या वारकर्‍याची त्यांना ओळख पटते. पालखीत सोनोपंत दांडेकर, धर्मप्रसार करण्यासाठी आलेले ख्रिस्ती मिशनरी, जैतुनबाई सारख्या मुसलमान वारकरी बाई मोकाशींना भेटतात. फुगड्या, रिंगण यासारख्या विजोड प्रथांसोबत कृष्णलीला करणारे एक बोवाजींशीही मोकाशींची भेट होते. आणि हे पुस्तक पालखीचे दर्शन न राहता जीवनाच्या वारीचेच दर्शन होऊन जाते. मोकाशींच्या लेखणीला प्रिय असलेली संथ गती पुस्तकाला आहे. क्वचितच असलेला सौम्य विनोद पुस्तकाच्या प्रकृतीशी पूरक आहे.

पुस्तकातील आवडलेला उतारा द्यायचा म्हटला तर सगळेच पुस्तक इथे टंकावे लागेल. पण तरीही मला आवडलेला एक उतारा देतो. "चित्रपटातला देखावा बदलावा तसा सगळा परिसर बदलला आहे. खडूसचा ओढा टाकला नि रस्ते सरळ आकाशापर्यंत धावत गेले आहेत. रस्त्याला वळण येतं ते सुद्धा केवढं पसरट! पालखीची दोन मैलांची मिरवणूक संपूर्ण दिसते आहे. इतकी लांब की डोळ्यांत मावत नाही. पावसानं काळपटलेल्या मातीवर स्त्रीपुरूषांची रंगीत रांग रांगोळीसारखी वाटत आहे.

रस्त्याच्या रुंदीत वारकरी आता मावत नाहीत. सासवडहून निघताना एका रांगेत चार वारकरी होते. आता बारापर्यंत गेले आहेत. उदार हातांनी माप भरावं तसं पालखीनं वारकर्‍यांचं माप पृथ्वीवर भरपेट ओतलेलं आहे. चालताना उभं राहणं जड जात आहे. बाजूच्या शेतांतून लगबगीनं वारकरी चालत आहेत. पालखी रंगात घुमू लागली आहे. खरं पाहता मी भाबडा झालो आहे. यातले खरे वारकरी किती, ढोंगी किती, आयुष्यभर दुसर्‍यांना लुबाडत राहून देव-देव करायला आलेले किती - असलं काही मनात येत नाही. तसंच, बाहेर स्पुटनिक उडताहेत, लढायांच्या तयार्‍या सुरू आहेत नि इथं हे काय चाललं आहे - असंही मनात येत नाही.

मी एकदम मागील काळात जातो. आत्ता आत्ता माणूस केवळ जगण्यासाठी एकमेकांना फाडून खात होता आणि आज इथं माझ्या डोळ्यांसमोर गुण्यागोविंदानं भजन म्हणत हजारो माणसं एकत्र चालली आहेत. केवढा भव्य देखावा हा! केवढी प्रगती ही!"

आता थोडेसे पुस्तकाच्या सजावटीविषयी. पुस्तकाचे लक्षवेधक मुखपृष्ठ आकर्षक आहे. शिवाय पुस्तकाच्या मलपृष्ठावरील आणि पुस्तकाच्या आतील रविमुकुल यांनी काढलेली वारकर्‍यांची रेखाचित्रे सुरेख आहेत. पुस्तकाच्या प्रारंभी असलेल्या मोकाशींच्या रेखाचित्रातून "किंचित कुरळे व उलटे फिरवलेले केस, स्नेहाळ डोळे, जाडसर जिवणी व गोलसर चेहरा ही प्रथमदर्शनी अनुकूल ग्रह करणारी" त्यांची आकृती समोर उभी राहते. पुस्तकासाठी वापरलेला कुरूकुरू वाजणारा कागदही उत्तम. त्यामुळे पुढील पानावरील अक्षरे मागील पानावर फारसा गोंधळ घालत नाहीत.


१९६१ साली प्रथम प्रकाशित झालेल्या मौज प्रकाशनाच्या या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती. किंमत १०० रुपये.


(सर्व चित्रे पुस्तकातील)

Saturday, September 29

चांदोबा

काही दिवसांपूर्वी हे कोडे लिहिल्यावर "का रे अजून चांदोबा वाचतोस का?" असं कुणीतरी मला विचारलं होतं. त्यावेळी उगाचच चांदोबाची आठवण येऊन पिसं उधळल्याप्रमाणं झालं. खरंच लहानपणी एका वेगळ्याच दुनियेत नेणार्‍या या अद्भुत पुस्तकाबद्दल अजून कोणी कसं बरं लिहिलं नाही?

"चांदोबा" ची ओळख करुन द्यायची खरं तर आवश्यकता नाही. माझ्या लहानपणी लहान मुलांच्या मासिकांचे पर्याय फारच मर्यादित होते आणि आता टीव्हीच्या धुमाकुळामुळे कोणी वाचतही नसेल. चांदोबा, किशोर, कुमार, ठकठक, चंपक आणि ज्ञान प्रबोधिनीचे "छात्र प्रबोधन" ही मासिके मला माहिती होती. त्यातही किशोर सारखे मासिक दिवाळी अंक वगळता कधी मिळालेच नाही. बहुतेक फक्त दिवाळी अंकच काढत असावेत. त्यांचे दिवाळी अंकात येणारे किल्ले करायला मजा यायची. ठकठक आणि चंपक वाचायला सुरुवातीला मजा वाटली. पण नंतर त्याचा प्रभाव फारसा टिकून राहिला नाही. चांदोबाचं मात्र तसं नव्हतं. चांदोबा वाचताना कधी कंटाळा आला नाही.


चांदोबाच्या गोष्टींमध्ये डावे-उजवे करणे शक्य नाही असे आता वाटते. पण त्यात सर्वाधिक आवडणारा भाग कोणता? असं विचारलं तर या प्रश्नाला "विक्रम आणि वेताळ" हे उत्तर सगळेच जण देतील. वेताळ पंचविशी नावाचं एक दुसरं पुस्तक त्यावेळी मिळायचं पण त्यात "चांदोबा"ची मजा नव्हती. साहस, अद्भुतरम्यता, गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण करून नंतर विक्रमाला बोलायला भाग पाडणारा वेताळाचा प्रश्न, कथेतील पात्रांची संस्कृतप्रचुर नावं हे सगळं एका वेगळ्याच जगात घेऊन जायचं.

आधी वाचलेल्या रामायण, महाभारतातल्या गोष्टी, ग्रीक कथा, लोककथा या पुन्हा पुन्हा वाचायलाही मजा येत असे.याचं महत्त्वाचं कारण कदाचित चांदोबातली लाल-पिवळ्या-हिरव्या-निळ्या अशा गडद रंगातली, पिळदार स्नायू असलेले हीरो आणि टपोर्‍या डोळ्यांच्या नायिका यांची रेखीव चित्रं हे असावं. चित्रांमध्ये जमिनीवर सरपटणारे नाग, निवडुंगाची झाडं, झाडावर बसलेले पक्षी आणि फांद्यावर अडकलेल्या मानवी कवट्या अशा बारीकसारीक गोष्टींची नोंद असायची."क्रमश:" असणार्‍या कथामालिकेतील एखादा भाग वाचला की त्याच्या आधीचे आणि नंतरचे भाग वाचण्यासाठी उरलेले चांदोबा मिळवण्यासाठी खूप धडपड करायचो. चांदोबात २५-३० वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली कथा पुन्हा वाचताना ती तितकीच ताजी वाटायची. या कथांचे मराठी अनुवाद कोण करतो देव जाणे. अगदी सुरेख अनुवाद असतात.

चांदोबाला जुलैमध्ये ६० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने चांदोबाचा जीवनप्रवास वाचनात आला. तोदेखील चांदोबातील गोष्टींइतकाच सुरस आहे. तो इथं देणे म्हणजे जीएंच्या भाषेत दुसर्‍याने बनवलेला स्वयंपाक आपण गरम करून वाढण्यासारखा आहे. पण तो देण्याचा मोह आवरत नाही.

जुलै १९४७ मध्ये सुरू झालेल्या चांदोबाची स्थापना नागीरेड्डी आणि चक्रपाणि यांनी केली. सुरुवातीला चांदोबा तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रकाशित होत होता. ६ आणे इतक्या किमतीच्या चांदोबाच्या सुमारे ६००० प्रती सुरुवातीला विकल्या जात होत्या.

चक्रपाणि आणि नागीरेड्डी यांनी चांदोबा सोबतच तेलुगू चित्रपटांच्या निर्मितीचेही काम सुरू ठेवले. चक्रपाणि यांचे १९७५ मध्ये निधन झाल्यानंतर विश्वनाथ रेड्डी यांनी चांदोबाचे काम पाहण्यास सुरुवात केली. विश्वम या नावाने ते अजूनही चांदोबाचे संपादकीय काम पाहतात. हळूहळू १२ भाषांमध्ये प्रसिद्ध होऊ लागलेला चांदोबा लोकप्रिय होत होता. १९८० मध्ये चांदोबाच्या सर्व भाषा मिळून सुमारे ९ लाख प्रती विकल्या गेल्या. नागीरेड्डी तोपर्यंत एक यशस्वी चित्रपट निर्माते म्हणूनही गणले जाऊ लागले होते. त्यांचे "राम और श्याम", "ज्युली" वगैरे चित्रपट हिट झाले होते.

१९८० मध्ये नागीरेड्डी यांच्या थोरल्या मुलाचे - प्रसादचे - निधन झाल्यावर नागीरेड्डींना नैराश्याचा झटका आला. त्यावेळी चित्रपट अभिनेते संजीव कुमार यांनी त्यांना मदत करून "श्रीमान श्रीमती" या नव्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा पाठपुरावा केला आणि नागीरेड्डींना नैराश्यातून बाहेर काढलं. मात्र नव्वदाव्या दशकात कामगारांच्या अडचणींमुळे काही कौटुंबिक तंट्यामुळे चांदोबाचे प्रकाशन काही काळ बंद करावे लागले. त्यावेळी चांदोबाची विक्री होती सहा लाख प्रतींची. नोव्हेंबर १९९९ मध्ये विश्वम यांनी पुन्हा प्रकाशन सुरु केले आणि तेव्हापासून सर्व भाषांतील चांदोबाची प्रतिवर्षी २ लाख प्रतींची विक्री होते. इन्फोसिस, प्रथम अशासारख्या संस्थांकडून मिळणारी मदत आणि वॉल्ट डिस्ने कंपनीबरोबर सहकार्यामुळे चांदोबाची आजची वाटचाल कमी अडथळ्य़ांची झाली आहे. विश्वम यांना चांदोबा ही मुलांवर भारतीय संस्कार करणारी एक विनालाभ संस्था बनवायची आहे.

चांदोबाला साठ वर्षं पूर्ण झाल्याच्या बातम्यांमुळे लहानपणी निर्भेळ आनंद देणार्‍या या दर्जेदार मासिकाची आठवण पुन्हा एकदा जागी झाली आणि एका दुकानातून सप्टेंबर महिन्याचा चांदोबा घेऊन आलो. मुखपृष्ठावरच अशोकवनातल्या सीतेचं चित्र होतं. मिथिला नगरीतली सीता दक्षिण भारतीय पद्धतीप्रमाणे अगदी मीनाक्षी. :) जयमल्ल, श्वानकर्णी, बिडाली, वीरबाहू, विक्रमार्क अशा नावांमध्ये पुन्हा गुंग होऊन गेलो. चांदोबा उगाचच इतके दिवस बंद केला. परत वाचायला सुरुवात केली पाहिजे.

Monday, September 24

रानातील प्रकाश

अनुवादित साहित्याला मराठीत मानाची खुर्ची कधी मिळत नाही ही नेहमीची रड आहे. जीए कुलकर्णी, शांता शेळके, वीणा गवाणकर, दुर्गा भागवत वगळता दर्जेदार मराठी अनुवाद माझ्या फारसे पाहण्यात आलेले नाहीत.

काही दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रदर्शनात जीएंचे "रानातील प्रकाश" हे छोटेसे पुस्तक हाती लागले आणि वाचायला सुरुवात केल्यावर पुस्तक संपल्यानंतरच भानावर आलो. बर्‍याच दिवसांनी असे झाले होते. "रानातील प्रकाश" हा Conrad Richter या लेखकाच्या "The Light in The Forest" या पुस्तकाचा अनुवाद.

Conrad Richter हा जीएंचा अतिशय आवडता लेखक. "माझ्या एखाद्या पुस्तकाचे परीक्षण छापून आले की, मी Richter चा अनुवाद केला आहे, ही गोष्ट कुणी नमूद करतो की काय हे उत्सुकतेने पाहत असे" असे म्हणण्याइतपत त्यांना तो आवडत असे. जवळचा वाटत असे. USIS च्या एका प्रकल्पांतर्गत या लेखकाची जीएंनी रान-गाव-शिवार ही कादंबरी मालिका, आणि "स्वातंत्र्य आले घरा", "रानातील प्रकाश" या स्वतंत्र कादंबर्‍या अशी पाच अस्सल खानदानी पुस्तके अनुवादित केली.

दोन संस्कृतींमधील संघर्ष हा चिरंतन चाललेला प्रकार आहे. एखादा नवा देश - नवा समाज कसा निर्माण होतो. झुंडींनी येणारे लोक तेथील मूळ रहिवाशांना मागे ढकलत, त्यांना नामशेष करत स्वत:ची नवी संस्कृती कशी निर्माण करतात असा या कथेचा गाभा असला तरी कहाणी आहे ती "ट्रू सन" नावाच्या जन्माने युरोपियन-अमेरिकन तरूणाची.

ट्रू सन ४ वर्षांचा असताना डेलावर इंडियन जमातीच्या लोकांच्या ताब्यात सापडतो. इंडियन लोक त्याला त्यांच्या पद्धतीप्रमाणे वाढवतात. त्याच्या मनावर पूर्णपणे इंडियन संस्कार होतात. १० वर्षांनंतर इंडियन आणि अमेरिकन लोकांमधील संघर्षविरामातील करारानुसार त्याला त्याच्या मनाविरुद्ध जन्मदात्या युरोपियन पालकांकडे पाठवले जाते. दु:खी ट्रू सन या नव्या जगातील आयुष्याचा मनापासून तिरस्कार करतो. संधी साधून तो पुन्हा आपल्या इंडियन पालकांकडे परत येतो. इंडियन लोकांना मागे हटवताना त्यांच्या लहान मुलांचे अमानुष बळी घेणार्‍या अमेरिकनांचा तिरस्कार करणार्‍या ट्रू सनला इंडियन लोकांकडेही गोर्‍या मुलांची कातडी सापडते. मात्र पुढे त्याला एका जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. त्याचा इंडियन ते अमेरिकन आणि नंतर पुढे होणारा प्रवास हा जीएंनी त्यांच्या अनोख्या भाषाशैलीने मराठीत अक्षरश: जिवंत केला आहे.

ही कादंबरी वाचल्यावर मी पूर्णपणे हलून गेलो. साम्राज्यवादी मानसिकतेचा इंडियन प्रदेशावर अन्यायाने झालेला कब्जा. दोन संस्कृतींमधील संघर्षामध्ये नेहमीच अंतर्भूत असलेली हिंसा आणि लहानपणापासून एका संस्कृतीत-एका संस्कारात वाढलेल्या मुलाला पूर्णपणे वेगळ्या संस्कृतीत पाठवल्यानंतर निर्माण होणारी गुंतागुंत या कादंबरीत अतिशय प्रभावीपणे व्यक्त झाली आहे.


अनुवाद वाचल्यानंतर मूळ इंग्रजी कादंबरी वाचण्याची इच्छाही लगेचच पूर्ण झाली. मूळ कादंबरीची भाषाशैली आणि अनुवादाची तुलना केली तर जीएंनी स्वत:च्या भाषाशैलीने या अनुवादात थोडे आक्रमण केले आहे असे थोडे वाटून गेले.

ऊर्जा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची किंमत ९० रुपये आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रकाशक श्रीनिवास पंडित यांनी Conrad Richter ची जीएंनी अनुवादित केलेली इतर पुस्तकेही प्रकाशित करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. :) त्यांच्याशी मागच्याच आठवड्यात फोनवर बोलणे झाले तेव्हा खूप वर्षांपूर्वी वाचलेली - अतिशय वेगळा विनोद असलेली "सोन्याचे मडके" (The Crock of Gold) ही जीएंची अनुवादित कादंबरी ब्लू बर्ड प्रकाशन प्रकाशित करण्याचा विचार करत आहे हे कळले.

खरंच ही सगळी पुस्तके वाचायला मिळाली तर काय मजा येईल.

अवांतर: The Light In The Forest ही कादंबरी येथे वाचता येईल.

Thursday, May 10

वाचलेच पाहिजे असे काही

मराठी वाचक नक्की कुठली पुस्तकं वाचतात हा एक प्रश्न पडला आहे.

काही दिवसांपूर्वी "मराठी पुस्तकांना सुगीचे दिवस" अशी बातमी पेपरात वाचली तेव्हा एक लहानसा आनंद झाला होता. म्हणजे मराठीसाठी तळमळ वगैरे सध्याची "इन थिंग" असलेल्या भावना असल्या तरी काही वर्षांपूर्वी वाचलेली आणि आता मराठी पुस्तकांचे मराठी दुकानदार तुसडेपणाने "औट ऑफ प्रिंट आहे" असं वाक्य आपल्या तोंडावर नेहमी फेकत असलेली जीए, गौरी देशपांडे, नेमाडे यांची पुस्तके कुत्र्याच्या कानासारखी पाने दुमडलेल्या अवस्थेत नाही तर नवीन कोरा प्रसन्न वास असलेल्या अवस्थेत परत वाचायला मिळतील. वाचून झाल्यावर मस्तपैकी कपाटात ठेवून देता येतील आणि आपल्याकडे इतकी भारी (किंमतीनं सुद्धा!) पुस्तकं आहेत याचा अभिमान वाटण्याची एक दुर्मिळ संधी मिळेल असं वाटलं होतं. (त्या दिवशी सिग्नलवर हिरवा दिवा होईपर्यंत मी चक्क वाट पाहिली!)

पण कसलं काय?

रविवारी दुसरी बातमी वाचली. मिलिंद बोकील यांच्या "कातकरी: विकास की विस्थापन?" या पुस्तकाच्या गेल्या वर्षभरात १००० प्रतीसुद्धा विकल्या गेल्या नाहीत. मराठी वाचकांची चॉईस पाहून धन्य वाटलं! खरं तर हे पुस्तक मराठीतील भयानक सुंदर पुस्तकांपैकी एक म्हणावं असं आहे. एकदम आउटस्टॅंडिंग!

मराठीत सामाजिक विषयांवरचे लेखन कमी आहे असे नाही. अगदी मराठी ब्लॉग लिहिणार्‍यांचा सॅंपल डेटा घेतला तरी एखाद्या मस्त कात-तंबाखू टाकून जमवलेल्या पानाप्रमाणे जमलेल्या लेखावर जर सामाजिक जाणीवेच्या चुन्याची दांडी धरली नाही तर मायबाप वगैरे वाचकांच्या प्रतिसादाच्या पिचकार्‍या कमी पडतात हे कोणाच्याही लक्षात येईल!

मिलिंद बोकील त्यांच्या स्वत:च्या लेखनाची भूमिका मांडताना म्हणतात:

...अलीकडच्या काळात काही पत्रकारांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी अतिशय माहितीपूर्ण व वाचनीय लिखाण केलेले आहे. एरवी समाजासमोर न येणारे प्रश्न मांडून त्यांनी मोठीच सामाजिक कामगिरी बजावली आहे. मात्र एकदा तशी जाणीव-जागृती निर्माण झाली की मग त्याच्या पुढचा टप्पा आपण गाठायला हवा. केवळ प्रश्न वा समस्यांची मांडणी करुन पुरेसे नाही तर ते सामाजिक प्रश्न असल्याने त्यामागचे समाजशास्त्रही उलगडून दाखवणे आवश्यक आहे. कुठल्याही प्रकियेमागचे शास्त्रीय रूप का तपासायचे, तर त्यातून 'समानतत्त्व' काढता यावे म्हणून, तसेच इतरांना त्याचा पडताळा पाहता यावा म्हणून. जर असा तत्त्वबोध जर जिवंत माणसांच्या अभ्यासातून झाला तर तो अधिक स्मरणीय होतो....

शिवाय हे लेखन मराठीत करण्याचेही मोठे सुंदर कारण त्यांनी दिले आहे.

...कारण आपल्या समाजासाठी लिहितो तेव्हा ते त्याच्याच भाषेतून लिहिणे आवश्यक असते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मातृभाषेचे पांग फेडणे हे कोणत्याही लेखकाचे कर्तव्य असते; मग त्या भाषेला मान्यता असो वा नसो, त्या भाषेत त्याची कदर होवो ना होवो. सुदैवाने असा तत्त्वविचार मांडण्याची ताकद मराठी भाषेमध्ये आहे. किंबहुना गंभीर तत्त्वविचार हेच मराठी भाषेचे वैशिष्ट्य आहे. व्यावसायिक आवश्यकतेपोटी ह्यातील बरेचसे लेखन मी इंग्रजीतही प्रसिद्ध केलेले आहे. मात्र त्या गोष्टीचे मल तेवढे अप्रूप वाटत नाही. हे ज्ञान फक्त मराठीतच आहे आणि म्हणून आपण मराठीकडेच गेले पाहिजे असे लोकांना जाणवले तरच मराठीचे महत्त्व वाढू शकेल....


"कातकरी: विकास की विस्थापन?" या पुस्तकात बोकीलांनी गेल्या काही वर्षात कोकणात आलेल्या औद्योगिकीकरणाच्या - आधुनिकीकरणाच्या लाटेचे होणारे सामाजिक आणि आर्थिक परिणाम. आणि या परिणामांचा कातकर्‍यांसारख्या दुर्लक्षित समाजावर पडणारा प्रभाव या विषयावर केलेल्या संशोधन प्रक्रियेबाबत समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून लेखन केले आहे.

पुण्या-मुंबईतच नव्हे तर राज्याच्या कोणत्याही शहरी-निमशहरी भागात राहणार्‍या माणसाला कातकरी हे आदिवासी लोक एवढेच ऐकून माहिती असते. मात्र हे कातकरी नक्की कोण आहेत? "आपला" आणि "त्यांचा" संबंध समाजशास्त्रीय दृष्टीने कितपत जवळचा आहे, कातकर्‍यांच्या गुलामगिरीची सुरुवात, कातकरी ते कोळसाकरी ते वीटमजूर असा त्यांचा प्रवास, जमिनीचा प्रश्न, कातकरी संस्कृती या सर्व मुद्द्यांना पुस्तकात अतिशय विस्ताराने स्पर्श केला आहे.

कातकर्‍यांसारख्या उपेक्षित समूहाला काही भवितव्य आहे का? त्यांच्या सभोवतालचे जग इतके वेगवान, स्पर्धेचे, स्वकेंद्रित होत असताना या आदिवासी समूहाला त्यात काही स्थान राहिले आहे का? कातकर्‍यांशी समांतर म्हणाव्यात अशा महादेव कोळी व ठाकर जमातींमध्ये शिक्षणाचा (तुलनेने) चांगला प्रसार झाला असताना गरीब-अल्पसंख्य अशा कातकरी समाजाला विकासाच्या समान संधी खरंच उपलब्ध होत आहेत का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उपस्थित करतानाच औद्योगिकीकरणामुळे पारंपारिक उपजीविकेवर परिणाम होत असला तरी कातकर्‍यांच्या आजूबाजूच्या वातावरणात आधुनिकतेचे वारे खेळू लागल्यामुळे पारंपारिक अन्यायाचे प्रमाणही तुलनेने कमी होत आहे. वातावरणातील खुलेपणामुळे या वर्षानुवर्षे दबून राहिलेल्या समाजाला मोकळेपणाने श्वास घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आश्वासक वाटाव्यात अशा या गोष्टीही बोकील अधोरेखित करतात.

कातकरी समाजाच्या लाभलेल्या सहवासाचे ऋण व्यक्त करताना बोकील म्हणतात,

...आपण शहरी, मध्यमवर्गीय माणसे स्वत:ला प्रगत म्हणवतो आणि कातकर्‍यांसारखे समूह आपल्यापेक्षा मागास आहेत असे समजतो. भौतिक बाबतीत ते खरे असेलही, पण इतर अनेक बाबतीत शंकेला जागा आहे. एकेकाळी आपण सगळेच आदिवासी होतो. तथाकथित प्रगतीची कास धरुन शहरी, औद्योगिक व्यवस्थेत अग्रभागी आलो. ह्या प्रवासात आपण पुष्कळ काही कमावले, पण पुष्कळ काही गमावलेसुद्धा.

आपण काय गमावले याचे भान कातकर्‍यांसारख्या समूहाशी संबंध येतो तेव्हा येते. शहरी, मध्यमवर्गीय जीवन पुढारले तेव्हा त्यात क्षुद्रपणाची, संकुचितपणाची आणि असंस्कृतपणाची वाढ झाली. स्पर्धा, स्वार्थ, हेवेदावे वाढले. लहानसहान गोष्टींतूनही आपला क्षुद्रपणा समोर येत राहतो. आपण रांगेत घुसाघुशी करतो. दुसर्‍याशी उर्मटपणे वागतो. सदैव आपलंच खरं मानतो आणि स्वार्थ साधायची एकही संधी सोडत नाही. आपल्या सगळ्या जीवनात उच्च - नीचता, धूर्तपणा, असभ्यपणा काठोकाठ भरुन राहिला आहे. अशा प्रकारची उर्मट, हिणकस, असभ्य वृत्ती मला कातकरी समाजात कधीही दिसली नाही. कातकरी समाज अज्ञानी, अशिक्षित असला तरी शहरी, मध्यमवर्गीय जीवनात जी दांभिकता, कर्कशता, चढाओढ आहे तिचा त्यांच्यामध्ये मागमूसही नाही. हे सगळे लोक एका अबोल सोशिकतेने, अलिप्तपणाने, शांतपणाने जीवन जगतात. वैयक्तिक लोभ, मत्सर कुणालाही सुटलेले नाहीत. स्वार्थ प्रत्येक माणसामध्ये असतो. पण कातकर्‍यांच्या वागण्या-बोलण्यात एक अबोल सभ्यता आहे. दुसर्‍याला लुबाडून आपली तुंबडी भरावी, धूर्तपणाने दुसर्‍याचा काटा काढावा, मिळेल तेवढे फुकटात लाटावे ह्या प्रवृत्ती त्यांच्यामध्ये दिसत नाहीत. त्यांच्या वाड्यावर हिंडताना हे सतत जाणवत राहायचे. या जाणिवेतून जो विश्राम मनाला यायचा, तो फार आल्हाददायक असायचा...

कातकर्‍यांची ही अबोल सभ्यता समजून घेता आली तर निश्चितच आपले जीवन अधिक चांगले होईल असा विश्वास व्यक्त करणारे हे पुस्तक गेल्या वर्षामध्ये इतर मराठी वाचकांना फारसं आवडलं नसलं तरी मला मात्र खूप आवडलं.



अवांतर: मिलिंद बोकील यांच्याबद्दल माझे आवडते ब्लॉगर सन्जोप सरांनी लिहिलेला लेखही जरुर वाचा

Wednesday, March 21

शब्दार्थाची शिक्षा

मी दादरकर यांनी लिहिलेल्या म्हणींच्या राज्यातील फेरफटका ह्या लेखात दिलेली अनेक भाषांमधल्या म्हणींमधील साम्यस्थळे वाचताना द.दि.पुंडे यांनी लिहिलेल्या "भयंकर सुंदर मराठी भाषा" या पुस्तकातील "शब्दार्थाची शिक्षा" हा लेख आठवला.

भारतात भाषिक विविधता आहे, पण संस्कृत भाषेच्या पूर्वपरंपरेमुळे एका भारतीय माणसाला दुसर्‍या भारतीय माणसाची भाषा कळणे जड जात नाही असे म्हणतात, ते तितकेसे खरे नाही. उलट एखादा स्वभाषेतील शब्द परक्या भाषेत वेगळ्या अर्थाने आला तरी त्याचा स्वभाषेत जो अर्थ आहे तोच घेतला जातो व घोटाळा होतो.

अनेक भारतीय भाषा संस्कृतपासून जन्मलेल्या असल्या तरी त्यातून आलेला एक शब्द अनेक भाषांमध्ये आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरत असतो. सत्कार ह्या शब्दाचे उदाहरण सर्वांच्या परिचयाचे आहेच.

संताप या शब्दाचे असेच आहे. बंगाली व कन्नडमध्ये हा शब्द "शोक" या अ