Showing posts with label पिंक. Show all posts
Showing posts with label पिंक. Show all posts

Friday, July 4

मै टल्ली हो गयी...!!

नमस्कार मंडळी,

तुम्ही 'मै टल्ली हो गयी' हे नवे गाणे पाहिले आहे का?
मद्यप्राशनाचा अभिनय करत मल्लिका ष्टेजवर नाचत आहे! सोबत रणवीर शौरीही काही झटके मटके मारत आहे. अहो मल्लिका मंडळी मल्लिका!! बॉलीवूडमधील अनेक नटमोगऱ्यांना जिच्या शरीरसंपदेचा हेवा वाटतो ती साक्षात मल्लिका. एवढे असूनही मल्लिकाला आनंद कसला तर टल्ली झाल्याचा.

आहाहा! अहाहा!! आहाहा!!! मल्लिकाने गाण्यावर काय नृत्य केलं आहे मंडळी. गाण्याचे शब्दही किती अर्थवाही आहेत. मल्लिकासारखी एक दिग्गज अभिनेत्री, रणवीर सारखा विनोदी अभिनेता आणि प्रीतिश नंदी कम्युनिकेशन. काय सांगू मंडळी.

वास्तविक मल्लिकाला अनेक गोष्टींचा आनंद व्हायला हवा. तिचे भूतकाळात अनेक चित्रपट सुपरहिट झाले. साक्षात जॅकी चॅन बरोबर अभिनय(! ) करण्याची संधी तिला मिळाली. मात्र तिला आनंद कसला तर टल्ली होण्याचा!!

तक तक तकना वे
मख मख मख मखना वे

बघा मंडळी लाटानुप्रास अलंकाराचा कसा सुरेख उपयोग केला आहे या ओळींमध्ये! याच अलंकारातले ’चंदू के चाचा ने चंदू की चाची को’ हे एक गाणे तुम्हाला आठवते का मंडळी? तुम्हाला नाही आठवणार ते. त्यासाठी माझ्यासारखा अभ्यास हवा मंडळी. पण ’चंदू के चाचा ने’ मधील अनुप्रास आणि ’तक तक तकना वे’ मधील अनुप्रास यामध्ये सूक्ष्म फरक आहे. ’तक तक तक’ अशी पुनरावृत्ती झाल्यामुळे गाण्याला एक आंदोलनाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. आमच्या कोकणातल्या वळणावळणाच्या रस्त्यांवर गाडी चालली की आमचे शरीर असे आंदोलित होते मंडळी.

पतियाळा पेग लगाके
तेरी गली विच आके
सब सूझबूझ होश गवाके
दीवानी मै पागल

ह्या ओळी बघा मंडळी. चित्तरंजन एका कवितेत म्हणतात ’तुझ्या शहरात मी आलो, खुळ्यागत भांडणे झाले. ’ तर इथे मल्लिका म्हणते 'तुझ्या गल्लीत मी आले आणि पतियाळा पेग लावला’.

मंडळी तुम्ही कधी पतियाळाला गेला आहात का? काय सांगू मंडळी पतियाळातल्या जुन्या दर्ग्याच्या मागे काय उत्तम मटण बिर्याणी मिळते. यम जर माझ्याकडे आला तर त्याच्या रेड्यावर डब्बलसीट बसून मी त्याला पहिल्यांदा पतियाळ्यातल्या जुन्या दर्ग्याच्या मागे मिळणारी बिर्याणी खायला घेऊन जाईन. घे लेको! खा म्हणेन. थांबा तुम्ही लगेच कल्पनाविलास करायला लागलात का? अहो मी हे यमाला म्हणतोय. त्याच्या रेड्यालाही पतियाळातल्या गोंडस म्हशी बघायला मिळतील. मात्र तुम्ही आपल्यासमोरचा वरणभात मुकाट्याने खा!

आणि मंडळी इथे विच हा शब्द पाहिला का तुम्ही. अहो विच म्हणजे चेटकीण नाही काही. तुम्हाला आमची मल्लिका काय चेटकीण वाटते का? साक्षात अनुष्कानेही तिचा हेवा करावा अशी अप्सरा आहे ती. विच हा एक बोलीभाषेतला शब्द आहे मंडळी. सोकॉल्ड सभ्यतेची आणि संस्कृतीची झूल मिरवणारे लोक या शब्दाला नाक मुरडतील. पण ’विच’ ची मजा कशाविच आहे का मंडळी? अहो संस्कृती आणि सभ्यता ह्या गफ्फा आहेत हो सगळ्या गफ्फा!

आणि मंडळी तुम्ही शेवटची ओळ काळजीपूर्वक वाचली का? ’सब सूझबूझ होश गवाके’. अहो मंडळी तुकोबांनी तरी वेगळे असे काय म्हटले आहे?

भक्तिरसामध्ये डुंबणाऱ्या तुकोबांना जसे "काय सांगो झाले काहीचिया बाही? पुढे चाली नाही आवडीने" असे वाटते. तसेच सोमरसामध्ये डुंबणाऱ्या मल्लिकाला ’सब सूझबूझ होश गवाके । दीवानी मै पागल" असे झाले आहे.

मै टल्ली हो गयी
मै टल्ली मै टल्ली मै टल्ली हो गयी

अहाहा! अहाहा!! या ओळी ऐकताना तुमच्या अंगावर शहारे आले नाहीत का मंडळी? या गाण्यावर मल्लिकाने कमरेला मारलेला झटका किती हळवा आहे मंडळी. अगदी जीव एवढासा होतो!

आणि काय नेमके शब्द वापरले आहेत इथे. ’मै टाईट हो गयी’ किंवा ’मै टुन्न हो गयी’ असे न म्हणता ’मै टल्ली हो गयी’ असे मल्लिका म्हणते मंडळी. अहो टल्ली ची नजाकत ’टाईट’ किंवा ’टुन्न’ मध्ये आहे का मंडळी? शिवाय मल्लिका आधीच इतकी टाईट आहे की तिला अजून टाईट व्हायची काही गरजच नाही. तिच्याबाबत मी जास्त काही बोलत नाही. अहो नाहीतर शरीराप्रमाणेच मनालाही कुबड आलेली मंडळी अश्लील अश्लील म्हणून ओरडायची!!

आणि हो! टल्ली हा शब्द ’तल्लीन’ या शब्दाशी किती जवळीक साधणारा आहे! अहो अनेक कट्ट्यांवरही लोक काय करतात. तर साहित्यप्रेमामध्ये, गप्पाटपांमध्ये तल्लीन होतात. हा आता काही करड्या जिभांचे लोक याला कंपूबाजी करून टल्ली होणे म्हणतील पण तो त्यांच्या ऱ्हस्वदृष्टीचा दोष आहे मंडळी. अहो साहित्यसेवा म्हणजे तरी काय? शिवास रीगलचे दोन पेग लावून कळफलक बडवणे हीच तर खरी साहित्यसेवा आहे मंडळी. आणि आपल्या आवडत्या स्त्रीसोबत मावळत्या सूर्याच्या साक्षीने समुद्रकिनाऱ्यावर दोन पेगांचा आस्वाद घेत टल्ली होणे हेच खरे प्रेम!! सोबत मोबाईलवर टल्ली गाणे जर चालू असेल तर दुधाच्या सायीत साखरंच!!

मंडळी, केवळ सोपे शब्द आणि मल्लिका यांच्या जोडीने या गाण्याला काय अप्रतिम उंची प्राप्त होते हे तुमच्या लक्षात आलंच असेल. असो मंडळी, एखाद्या वरवर अगदी साध्या वाटणाऱ्या गाण्यातदेखील काय विलक्षण ताकद असू शकते याचं हे गाणं म्हणजे उत्तम उदाहरण आहे. हे गाणं ऐकलं (आणि विशेषत: पाहिलं) की मन बेचैन होऊन जातं. सोनेरी पारदर्शक रंगाच्या द्रवामध्ये बर्फ बुडावा तसं ते स्वप्नामध्ये बुडून जातं आणि आपण गुणगुणू लागतो.
मै टल्ली हो गयी मै टल्ली हो गयी!!

-- आजानुकर्ण पुणेकर

Wednesday, June 18

लावूनि कोलीत । आपुला करितील घात ॥

भले शाब्बास संजय राऊतसाहेब. या लेखात तुम्ही सनातनवाल्यांची फुलटूच केलेली वाचोन आम्हास परमसंतोष झाला आहे.

अहो मिशा चिकटवोनी का कोणास मावळा होता येते? जे कृत्य करण्याचे लायसन फक्त शिववडावाल्यांना आहे ते कृत्य असे ऐर्‍यागैर्‍यांनी स्वत:च्या शिरावर घेतले की त्यांची मानगूट मोडोन त्यांचा फजितवडा होणार हे तर विधिलिखितच आहे.

बॉम्बस्फोट झाल्यावर आमचे (आणि तुम्ही ज्यांना तीनचारदा गारद केले आहे त्या बोरूबहाद्दर दाढीवाल्या वागळ्यांचेही) हेच मत होते की सनातनवाल्यांनी हिंदूंची इज्जत घालवली. कितीदा सरळ केले तरी वागळ्यांच्या दाढीचे केस वाकडेच! साल्याला एकदा खोपच्यात घेवोनी काही समज देणे तुरंत गरजेचे आहे.

आपले 'हिंदूंची इज्जत जाण्याचे कारण बॉम्बस्फोट हे नसून स्फोटासाठी वापरलेले बॉम्ब फुसके होते' हे नेमके वाक्य वाचून आम्ही वागळ्यांना विसरोन सेनेविषयीच्या अभिमानाने आमचा ऊर भरोनी आला आणि बाराबंदीचे तीन बंद तुटले. असो. धर्मासाठी (दुसर्‍यांचे) प्राण हाती घेणार्‍या मराठ्यांच्या राज्यात तीन बंदांची काय किंमत.

आजकाल आम्ही आपल्य पेप्रामध्ये असेही वाचत आहोत की सर्वत्र गनिमांनी धुमाकूळ घातला आहे. हिरव्या आक्रमणामुळे अवघे स्वराज्य हातातून जाते की काय अशी कंडिशन आलेली आहे. तुम्ही असेही लिहिता की काटेसे काटा निकालना चाहिये!

या आक्रमणाला हिंदुत्त्वाच्या वज्रमुठीनेच जवाब देवोन अवघ्या राज्यात भगव्याच्या शिलेदारांच्या तोफा धडाडल्या पाहिजेत, बॉम्बचे स्फोट झाले पाहिजेत. मात्र मुठीचा एकमेव उपयोग बोंबा मारणे एवढेच ज्या नामर्दांना ठाऊक आहे त्यांचे डोळे उघडो न उघडो मात्र आमचे डोळे साफ उघडले आहेत. हिंदूंनी जिहाद पुकारण्याची वेळ आली आहे.

गुस्ताखी माफ असावी पण आम्हालाही एक सूचना करावीशी वाटत आहे. हर एक गावातील आपल्या छावण्यांमध्ये शिवबॉम्ब बनवण्याचे कुटीलोद्योग चालू करावेत. याच देशातल्या परप्रांतीय गनिमांनी गावोगाव मराठी माणसाचे धंदे हिसकावोन स्वत:चे बस्तान बांधले आहे. त्यांना यवन आणि म्लेंच्छही सामील आहेत. हे स्वराज्याविरोधातले मोठेच कारस्थान आहे. मात्र येकवार शिवबॉम्बचे बार सुरु झाले की बेरोजगार हिंदू मराठी तरूणांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होवोन सर्वत्र आबादीआबाद होईल व हिरव्या गनिमांना पळता भुई थोडी होईल. 'शिवबॉम्बचे बार' मधील 'बार' या शब्दाला आबा डोळे वटारतील. मात्र असे गाजरपारखी स्वराज्यात असायचेच. त्यांनी ज्यास्ती तकलीफ दिली तर 'स्फोट' म्हणा येवढेच आमचे सांगणे.

मात्र तुम्ही लेखामध्ये टिळकांचे नाव घेतलेले मात्र आम्हास पसंत नाही. ही अशी नावे वाचून आम्हाला चकण्यात खौट वाटाणा यावा तसे होते. बॉम्ब बनवायचे सोडोन उगीच बोरू घासत बसण्याचे काम करणार्‍या मंडळींना ज्यास्ती महत्त्व देणे काय कामाचे? आम्ही तर म्हणतो त्यांनी देखील हिंदूंची इज्जतच घालवली होती. नशीब चांगले की या महाराष्ट्रभूमीत शिवरायांच्या नावाने एक सेना (आणि नंतर वडा) निर्माण झाला आणि गेलेली इज्जत थोडी का होईना परत आली. सगळी इज्जत परत आणायची असेल तर शिवबॉम्बचे तेवढे मनावर घ्यावे!

तसे झाल्यास आम्ही आपणास ग्यारंटी देतो की येत्या निवडणुकीत आम्ही बॉम्बचेच सॉरी धनुक्ष्यबाणाचेच बटण दाबतो.

Thursday, April 24

रेडिओ मिरची आणि संत तुकाराम

रेडिओ सिटी सुरू झाल्यामुळे आता रेडिओ मिरचीचे खंग्री बूच लागले आहे. वैतागलेला श्रोतावर्ग टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी त्यांची कंबर कसून प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे 'मराठी' गाणी ऐकवणे हा!

खरं म्हणजे रेडिओ मिरचीवर मराठी गाणी सुरू झाल्याचे मित्राकडून ऐकल्यावर मी बेशुद्ध पडलो होतो. पण चप्पल हुंगवणे, नाकाला कांदा लावणे वगैरे प्रकारांऐवजी रेडिओ मिरची मला ऐकवल्यावर परत शुद्धीवर आलो. नंतर आत्मक्लेश सहन करून एक पूर्ण दिवस रेडिओ मिरचीची गाणी ऐकली पण त्यात मराठी गाणं कुठंच ऐकायला मिळालं नाही.

थोडं खोदून खोदून चौकशी केल्यावर कळलं की सकाळी ५ ते ७ या वेळात 'काही' मराठी गाणी ऐकवली जाणार आहेत. अधिक खोलात गेल्यावर असंही कळलं की रेडिओ मिरचीची आधीची योजना ही रात्री १ ते ३ किंवा रात्री ३ ते पहाटे ५ या वेळात मराठी गाणी प्रसारित करण्याची होती. पण या वेळामध्ये काही गुरखे, रात्रपाळीवरचे कामगार वगैरे जागे असतात. मात्र पहाटे ५ ते ७ या साखरझोपेच्या काळात एकही माणूस जागा असणार नाही याची त्यांनी खात्री करून घेतली. विशेषत: इतक्या उन्हाळ्यात पहाटे जरा गार हवा असल्यावर चांगली झोप लागते तेव्हा ५ ते ७ ही ओळ गाण्यांच्या प्रसारणासाठी उत्तम.

असो.

भणभण गाणी, उबगवाण्या संतापजनक जाहिराती आणि तोंडशिंदळीचे निवेदक असल्यावर रेडिओ मिरची स्वत:हून ऐकणार्‍यांबद्दल काही ठेवणीतले शब्द वापरता येतील. पण मराठीच्या टवाळ्या करून हिंदीच्या चोळ्या धुणार्‍या या तुंग्रुस रेडिओ मिरचीवाल्यांबद्दल आमच्या तुकोबांनी एक अभंग आधीच लिहून ठेवला आहे. आम्हाला तो अभंग फार्फार आवडतो.


संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥
संतासी देखोनि करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥
तुका ह्मणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥

वा!

खरं तर गुटखासंप्रदायी थुंकसैनिकांनी एखादे निषेधात्मक पाणीदार आंदोलन जाहीर करायला पाहिजे.

Wednesday, April 2

दिल्ले दान... घेतले दान...

आमचा लाडका वगैरे सुपरष्टार शेतकरी असल्याचे जाहीर झाले आणि 'सत्यमेव जयते' नुसार अखेर सत्याचा विजय झाला. (कोण रे तो भिखू म्हात्रेचा सत्या म्हणतोय? सुपरष्टारच्या कलागुणांची कदर नाही त्याला! ठेचा साल्याला!)

डोक्याला मुंडासे बांधून सुपरष्टार बैल हाकणार. जयावैनी डोईवर भाकरी न भाजी घेऊन मळ्यावर येणार, नाजूक लाडकी ऐशू उन्हातान्हात पिकाचं राखण करणार, गोफण घेऊन अभिषेक दगडं मारणार आणि पाखरांना बुजवण्यासाठी अमरसिंगजी बुजगावणं म्हणून शेतात उभं राहणार या विचारांनी कंठ अवरुद्ध झाला आणि श्वास घेता येईनासे झाले. टाय सैल केला तेव्हा कुठे बरे वाटले!

चित्रपट पाहणार्‍या अवघ्या देशाचा 'आयकॉन' असलेले अमितशेठ आता शेतकर्‍यांचेही आयकॉन होणार आणि अमिताभचं खत, अमिताभचं बेणं बियाणं, अमिताभची कीटकनाशकं यांचा खप सर्वत्र वाढणार याची खात्रीही झाली. गेला बाजार आत्महत्या करण्यासाठी तरी शेतकरी 'रीड अँड टेलर' चे सूत वापरलेले दोरखंड वापरतील आणि त्यांच्या जीवनाचा नाही तर निदान मृत्यूचा दर्जा तरी उंचावेल या विचाराने समाधान पावलो.

एखाद्या सकाळची वेळ - किंवा मंगलप्रभात म्हणूया - होती. कोंबड्याने तिसरी बांग दिली आणि वेळेबरहुकूम भारनियमन सुरू व्हावे त्याप्रमाणे आकाशातल्या चांदण्या विझल्या आणि काजळी साचलेल्या कंदिलातील प्रकाशाप्रमाणे लालसर पिवळा प्रकाश पूर्वेकडे दिसू लागला. परसाकडे गेलेले अमितशेठ अजूनही घरी न आल्याने जयावैनींना काळजी वाटू लागली होती. वयोमानानुसार अमितजींना वेळेवर 'होत' नसे. थोडा जास्तच वेळ लागत असे. आणि 'इसबगोल' घ्या म्हटलं तर डाबरच्या उत्पादनांची जाहिरात करतो आणि इसबगोल घेतलं तर व्यावसायिक नीतीमत्तेचं काय होईल असं काहीसं अमितशेठ बोलून गेले होते. आयुष्यभर पर्वा न केलेल्या नैतिकतेचं गळू अमितशेठना आताच कसं झालं या काळजीनं जयावैनींना पोखरलं होतं. नाहीतरी उतारवयात विस्मरण होतंच म्हणा. फिल्मी आयुष्य आणि खरे आयुष्य यात गल्लत होतेच. चित्रपटातील संवाद चुकून बोलून गेले असतील या भावनेनं त्यांना काडीचा आधार दिला. मात्र हे शेतकर्‍याचं जीवन जगताना त्या पुरत्या वैतागल्या होत्या.

अंबाड्याच्या भाजीला ऐशूने टाकलेल्या लसणीच्या फोडणीचा चर्र असा आवाज झाला आणि जयावैनी तंद्रीतून जाग्या झाल्या. कोनाड्याजवळ अभिषेक उभा होता. सकाळपासून तीन वेळा दाढी करण्याच्या प्रयत्नात कापून घेतल्यामुळे त्याने 'ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्त असू द्यावे समाधानी' या उक्तीनुसार दाढी करण्याचा नाद आता सोडून दिला होता. त्याऐवजी दाढी खाजवण्याचे काम सुरु झाले होते. मात्र आपण उजव्या हाताने दाढी खाजवत आहोत आणि बाप तर डावखरा आहे हे त्याच्या अचानक ध्यानात आले आणि कोणाचे लक्ष नाही असे वाटून त्याने झटकन हात बदलला. तरी ऐशूने हे पाहिलेच आणि नाराजीने नाक मुरडले. बिच्चारा अभिषेक खजील झाला!

सुपरष्टार 'काम' आटोपून घराकडे येताना दिसत होते. मागोमाग हातात लोटा घेऊन अमरसिंगजीही होते. अंगणात आल्यावर अमरसिंगजींनी बंबाची राख घेऊन (स्वतःचे) हात खसाखसा धुतले आणि सुपरष्टारच्या पायावर पाणी ओतले. सुपरष्टार आत आल्याआल्या जयावैनी सुरू झाल्या.

'काय हे मानूस म्हनायचं का सोंग? पुरता वैताग आला मला आता.'
'अगं.'
'चला बगू परत 'जलसा' ला इथं मला जमत नाही. चुलीच्या धुरानं डोळ्याचा धबधबा झाला पार!'
'अगं पन.'
'ते काही नाही. चला म्हंते ना!'
'तू जरासंक ऐक तरी!'
'काय जगनं म्हनायचं का काय हे. सकाळी उठल्यावर शेनाने सारवून घ्या. बंब पेटवा. दुपारच्याला टकुर्‍यावर टोपली घेऊन उन्हातान्हात शेतात जा.'
'अगं जरा समजून घे.'
'शेती करन्यासाठी आपल्याकडं साधनं तरी हायेत का? बैल पन एकच आहे.'
ऐशूने चमकून अभिषेककडे पाहिलं. नेहमीप्रमाणे त्याच्या बथ्थड डोक्याला काही समजलंच नाही.
’आता, बैल मागवलेत की तिकडून. आनी बैलांस्नी म्हराटी यायला पायजेल असं कोनी म्हनू बी शकत न्हाई ना.’
’अहो पर मानसान्ला कुठेबी राहायची परवानगी अस्ते. पन बैलान्ला असते असं बैलांच्या बद्दल राज्यघटनेत लिव्हलेलं हाये का?’
'हे बघा कारभारनी. तुमच्या डोक्यात अक्कल कमी असं आम्ही म्हनून गेलोय ते काही खोटं नाही.'
'ऑ? आता काय झालं. चांगला मुंबईतला बंगला सोडून हितं घानीत राहायचं दळभद्री लक्षन तुम्हास्नी सुचलं तर तुम्ही शहाने आनी आम्हाला अक्कल न्हाई व्हय.'
'अहो, आता कसं सांगू.'
'काय ते'
'थोडं गप्प बसाल तर आम्ही बोलनार ना.'
'बोला की. म्या काय त्वांड धरलंय काय तुमचं!'
'अगं, सरकारनं शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्याली हाये. आता आपन बी शेतकरी न्हाई का? मग? अभिषेकच्या लग्नाचा सम्दा खर्च आता हिकडून वसूल करता येईल बग. अमरसिंगजी काहीतरी इल्लम काढतीलच. काय अमरसिंगजी?'
'व्हय तर.'
'हांग्गाश्शी. मातुर येच्यासाठी आपल्याला थोडी कळ काढायला लागंल. घुसलं का आता टकुर्‍यात!'
’आता गं बया! व्हय व्हय. आता कुठं समजलं’

बापाच्या अचाट बुद्धीची ही युक्ती ऐकून अभिषेक अवाक झाला आणि आश्चर्याने तोंडात घातलेले बोट उजव्याच हाताचे आहे याचे त्याला भानही राहिले नाही!

व्यंगचित्र सौजन्य desicartoonist.blogspot.com

Monday, February 4

शाळा

आमच्या सुपरष्टारला कोणीही (स्टुलावर उभे राहून) टपली मारावी आणि त्याचे केस विस्कटवून टाकावे याला काय म्हणावे?

राजसाहेबांनी केलेल्या वक्तव्याने आमचे मन इतके दुखावले तर सुपरष्टार साहेबांचे किती दुखावले असेल याची कल्पनाच करवत नाही. आम्ही तडक 'बंगल्या' वर पोचलो. जयावैनी फोनवरून डायलॉग लिहून घेत होत्या. मात्र आम्हाला पाहून गडबडीने फोन खाली ठेवून "या या" म्हणाल्या.

आम्ही अचंबित!

"बसा, बसा. थोडा चहा टाकते.", जयावैनी.

"चहा तर टाकाच. थोडं आलंही टाका. ठेचून! काय थंडी आहे. हू हू हू हू.". फुकट मिळते तर सोडायचे कशाला अशी आमची (सुपरष्टारप्रमाणेच) पॉलिसी आहे.

"आलं? कोण आलं?" जयावैनी घाबरल्या. त्यांना वाटलं 'कार्यकर्ते' आले की काय!

"अहो. कोणी आलं नाही. आलं म्हणजे जिंजर! अहो, अद्रक अद्रक! बंदर क्या जाने अद्रक का स्वाद असं तुम्ही म्हणता ना! आम्हाला आवडतो बाबा त्याचा स्वाद! विशेषत: अशा थंडीत चहा काय मस्त लागतो."

"छ्या. ही काय थंडी आहे! थंडीची खरी मजा तर आमच्या उत्तर प्रदेशात." आजूबाजूला 'कार्यकर्ते' नाहीत हे पाहून जयावैनींनी मनातली गोष्ट सांगितली.

"हे बाकी खरं बोललात! 'पुनर्जन्म हो मेरा तो हो गंगा के तटपर!' असं कुणीसं म्हटलंच आहे. असो. चहाला उकळी आली असेल. उतू जाईल. बाकी 'शिक्षणमहर्षी अमितजी' कुठे दिसत नाहीत?", आम्ही.

"बाराबंकीला गेलेत. विटांची डिलीव्हरी यायची होती. लवकरात लवकर काम पुरं करावं म्हणते. गुढीपाडव्याला झालं तर सोन्याहून पिवळं. तेवढंच विरोधकांचं तोंड बंद राहील.", जयावैनी.

"त्याचीच युक्ती सांगायला आलो होतो ना! म्हटलं विटांचा एखादा ट्रक महाराष्ट्रातून न्या. नंतर उगीच बोंबाबोंब नको.", आम्ही.

जयावैनी चहा आणायला आत गेल्या. आम्ही फोनजवळ जाऊन कोणत्या चित्रपटाचे डायलॉग आहेत ते पाहू लागलो. वडील, भाऊ असे काहीतरी लिहिले होते. बहुधा चित्रपट कौटुंबिक असावा.

चहा घेऊन घरी आलो आणि संध्याकाळी टीव्हीवरच्या बातम्या पाहू लागलो तर काय चमत्कार!

आम्ही फोनजवळ वाचलेले डायलॉग जयावैनी पत्रकारांसमोर मारत होत्या!!

ही नवीनच शाळा म्हणायची.

आम्हाला इतुके दिवस फक्त 'मातोश्री' माहिती होत्या. शाळेत न जाता तातश्री आणि दादोश्री हे देखील शिकलो.

असो.

Sunday, January 20

भारतरत्नचा घोळ आणि उपाय

एक तर 'भारतरत्न' च्या वादाबद्दल (मराठी ब्लॉगांव्यतिरिक्त इतरत्र) इतकं सारं लिहून झालं आहे की आमच्या एका मित्राकडे वाचलेल्या "बोलणे थोडे पण थुंकी फार" या वाक्प्रचाराचीच आम्हाला आठवण झाली!

मराठी ब्लॉग विश्व मात्र अर्थपूर्ण वगैरे लिहित असल्याने त्यांनी हा निरर्थक विषय दुर्लक्षित केला (आणि थुंकी गिळून टाकली) याचा मात्र आम्हाला अतीव आनंद झाला. :)

पण आम्ही मात्र सवयीप्रमाणे एक पिचकारी मारत आहोत. (कुत्र्याचे शेपूट! शेवटी... हम्म!)


पहिली गोष्ट अशी की राजकीय नेत्यांना मिळणार्‍या भारतरत्न पुरस्काराचा विचार करायचा तर प्रात:स्मरणीय बाबासाहेबांसारखी आपल्या कर्तृत्वाने, अभ्यासाने, व्यासंगाने त्या पुरस्काराचाच सन्मान करणारी राजकीय व्यक्ती सध्या भारतात नाही आणि पुढील काळात होईल की नाही याबाबतही आम्ही साशंक आहोत. त्यामुळे राजकीय नेत्यांऐवजी कलावंतांना हा पुरस्कार द्यावा अशी सुरक्षित खेळी खेळणे आम्हाला बरे वाटत आहे. त्यातही सध्याच्या पुरस्कारासाठी प्रत्येकाने आपापले घोडे स्पर्धेत उतरवलेले पाहून आम्हालाही आमची नेहमी विन मध्ये येणारी घोडी श श श शाहरूख आणि अमिताभशेठ बच्चन यांना उतरवण्याचा मोह झाला होता!


समजा उद्या अमिताभशेठला वाटले की भारतीय (म्हणजे हिंदी) चित्रपटसृष्टीची पैसे घेऊन सेवा वगैरे केल्याबद्दल आपण नाही तर निदान आपल्या राजबिंड्या वगैरे पुत्राला - अभिषेक याला - हा पुरस्कार मिळावा*. तर मुलायमसिंगांना पुरस्कार मिळेपर्यंत अमिताभशेठ थेट अशी मागणी करू शकत नाहीत. आणि आता या वयात पक्ष वगैरे बदलणे हे कजरा रे च्या तालावर नाचण्याइतके सोपेही नाही. शिवाय बच्चनशेठ व फ्यामिली यांची शारीरिक उंची जास्त असल्याने त्यांना लागणारे जास्त कपडे पाहता कपड्यांचे दुकानदार जरी त्यांच्या बाजूने उभे राहिले तरी अभिषेक महिनोन्महिने दाढीबिढी न करता तसाच घाणेरडा राहतो** आणि इतरांना दाढ्या वाढवण्यास उद्युक्त करतो हे पाहून अखिल पुणे केशकर्तनालय संघ, वस्तरा व ब्लेडचे दुकानदार वगैरे त्याला हा पुरस्कार मिळण्यास विरोध करणार की नाही?
(तुम्ही म्हणाल दाढीच्या बाबतीत शाहरुख तसा सेफ आहे. हो. मान्य! पण तो कपडे घालत नाही...)


त्यामुळे आमचा मोह आम्ही आवरत आहोत व निष्कारण वाद टाळत आहोत. कारण आम्हाला एक लख्ख युक्ती सुचली आहे!


हा सर्व वाद टाळण्यासाठी अभिषेकशेठने किंवा शाहरुखशेठने आपल्या पुत्राचे नाव 'भारतरत्न' ठेवून द्यावे आणि आपल्या गुंड्या पुत्राचा तिन्ही लोकी झेंडा लागण्याची वाट पहावी. बस्स दुसरे काही नाही. जसजसा मुलगा प्रसिद्ध होत जाईल तसतसे 'भारतरत्न अभिषेक बच्चन' किंवा 'भारतरत्न शाहरुख खान' हे नाव देखील आपोआप प्रसिद्ध होईल.

नाही का?

शेवटी भारतरत्न म्हणजे काय तर आपल्या नावाआधी लावावयाची साडेपाच अक्षरे. त्यापेक्षा आपण त्याला अधिक महत्त्व थोडीच देतो?


*गाढवाला आपले शिंगरू गोंडस वाटते अशा अर्थाची एक इजिप्शियन म्हण आम्हाला आठवली.
** एक्झिबिट ए: स्वत:च्या लग्नात सुद्धा दाढी केली नाही. शी!

इत्यलम!

Friday, December 7

बेडूक, नार्सिसस, भस्मासुर, अतिशयोक्ती आणि चड्डीत राहणे

कॉलेजात असताना आमच्या मित्रमंडळींमध्ये "चड्डीत राहणे" हा एक वाक्प्रचार अत्यंत प्रसिद्ध होता. "अंथरूण पाहून पाय पसरावे" अशा साधारण अर्थाचा हा वाक्प्रयोग असला तरी त्याला अनेक छटा होत्या. कोणी जादा 'माज' करत असला की त्याला सरळ करण्यासाठी ‌"ए भो, चड्डीत राहा ना!" असे आम्ही म्हणत असू. आता हा वाक्प्रयोग येथे आठवण्याचे काय कारण? सांगतो. त्यापूर्वी ह्या अडीच गोष्टी वाचा.

१. मेंढककाण्ड अर्थात बेडकाची प्रेमकहाणी: प्लवंगेंद्र बेडकाचे मंदोदरी बेटकुळीवर फारच प्रेम. अगदी शाहरूख खानचं काजोलवर असतं ना तस्सं. पण अर्थातच मंदोदरीचे तातश्री मेंढकोबांना हा विवाह पसंत नव्हता. अमरीश पुरीच म्हणा ना! त्यांनी तिचा हात वृषभकुमार नावाच्या बैलाच्या हाती देण्याचे ठरवले होते. मंदोदरी दिसायला फारच सुंदर. वार्‍यालाही तिच्या रेशमी काळेभोर कुंतलाशी खेळावे वाटे. तिच्या भ्रुकोदंडांना पाहून अर्जुनाचे गांडीवदेखील शरमेने खाली पाहू लागले असते. तिचे गाल लालबुंद सफरचंदांची आठवण करून देत असत तर डाळिंबाचे दाणे शाखेमध्ये उभ्या राहणार्‍या स्वयंसेवकाप्रमाणे रांगेत एकामागे एक "दक्ष" उभे होते. तिचे ओठ... हाय... तिच्या ओठांकडे पाहून प्लवंगेंद्राला मदिरेची आठवण होई तर तिची नाजूक मान पाहून त्याला सुरईची म्हणजे पुन्हा मदिरेचीच आठवण होई. बेवडा कुठला! आता वर्णनासाठी मी जास्त खाली जात नाही. काय ते तुम्ही समजून घ्या!


हा तर आपले अमरीश पुरी ऊर्फ मेंढकोबांनी मंदोदरीचे म्हणणे ऐकून घेण्याचे ठरवले आणि प्लवंगेंद्राला सांगितले की त्याने जर वृषभकुमाराइतके मोठे होऊन दाखवले तर मंदोदरी त्याचीच. प्रेमात शहाणी माणसे देखील 'चड्डीत राहत' नाहीत तर बेडकाचे काय. एखाद्या पंपाने सायकलच्या ट्यूबमध्ये हवा भरावी तद्वत प्लवंगेंद्र फुस्स फुस्स करत स्वत:च्या शरीरामध्ये हवा भरत गेला. प्रेमात दिवाणी झालेली मंदोदरीचे मुखकमलही प्लवंगेंद्राच्या शरीरासोबत फुलत होते. पण शेवटी व्हायचे तेच झाले. नियतीने कपाळावर जे लिहिले आहे त्याला कोणी टाळू शकतो का? फुल्ल हवा भरलेल्या टायरला पंक्चरच्या दुकानदारांनी रस्त्यावर टाकलेला ४३ खिळ्यांपैकी नेमका खिळा लागावा आणि टचकन टायर फुटावा त्याप्रमाणे प्लवंगेंद्र फुटला. वृषभकुमारासारख्या धटिंगणाला नाजूक मंदोदरी मिळाली आणि प्लवंगेंद्राच्या फोटोला हार मिळाले.कारण काय तर 'चड्डीत राहा ना भो!' असे सांगणारे मित्र त्याला मिळाले नाहीत!

२. नार्सिससची कथा: नार्सिससची कथा ही अभिजात ग्रीक कथा असल्याने सामान्यजनांना माहिती नसावी. नाही तर त्याला अभिजात कसे बरे म्हटले असते? पुराणकाळातील हृतिक रोशन शोभावा असला राजबिंडा हा तरूण. वर्णन बरेचसे मंदोदरीसारखेच. म्हणजे रेशमी कुंतल, चाफेकळी नाक वगैरे. फक्त त्याची शरीरयष्टी बलदंड असावी. त्याला सिक्स प्याक ऍब्जही असावेत. शाहरूखखानपूर्वी अशी शरीरयष्टी लाभलेला केवळ नार्सिससच. स्वत:चे रूप कधीही न पाहिलेल्या या तरूणाचे (म्हणजे नार्सिसचे. शाहरूखचे नव्हे!) सौंदर्य अगदी मंत्रमुग्ध करणारे होते.

नेहमी सूर्योदयापूर्वी उठणारा नार्सिसस रात्री जास्त 'झाल्यामुळे' सकाळी उशीरा तळ्यावर गेला. (कशाला ते विचारू नका! घाणेरडे कुठले!) आणि स्वत:चे रूप त्याने प्रतिबिंबरूपात तळ्यामध्ये पाहिले आणि काय हो आश्चर्य. स्वत:च्याच रुपाच्या प्रेमात पडून तो तळ्यात पडला. कारण काय तर 'चड्डीत राहा ना भो!' असे सांगणारे मित्र त्याला मिळाले नाहीत!

३. भस्मासुराची कथा: ही भारतीय कथा असल्याने अभिजात नसावी. त्यामुळे कथा सर्वांनाच माहिती असावी. मोहिनीवर लाईन मारण्यात दंग झालेल्या भस्मासुराला कसलेही भान राहिले नाही आणि स्वत:च्या डोक्यावर हात ठेवून त्याने स्वत:चे भस्म करून घेतले. कारण काय तर 'चड्डीत राहा ना भो!' असे सांगणारे मित्र त्याला मिळाले नाहीत.

उपसंहार:
शाळेत असताना आम्हाला व्याकरणामध्ये 'अतिशयोक्ती' हा अलंकार होता. इयत्ता सातवीपर्यंत आमच्या वर्गात फक्त वर्गबंधू असत. सहशिक्षणाचे पुरोगामी वारे व परिणामी वर्गभगिनी वर्गात नसल्याने आम्ही मास्तरांकडेच लक्ष देऊन प्रामाणिकपणे शिक्षण घेत होतो. (आठवीपासून वर्गभगिनी वर्गात आल्या नि शिक्षण बोंबलले! ते असो.) तर अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण देताना आमचे मास्तर खूप मस्त उदाहरण देत असत.

"दिडकीचे तेल आणले, सासुबाईंचे न्हाणे झाले, मामंजींची शेंडी झाली, भावोजींची दाढी झाली, उरले तेल झाकून ठेवले,ते येऊन मांजराने सांडले, वेशीपर्यंत ओहोळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला"

सुंदरच. अगदी +१.

भविष्यकाळात मराठी भाषेचे अलंकार शिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आली तर दिडकी, ओहोळ वगैरे शब्दांचे अर्थ सांगताना घाम फुटायचा ह्या विचाराने झोप येत नव्हती. तरी बरे मुले आजकाल कॅमलिन कंपनीचे साहित्य वापरतात त्यामुळे उंट म्हणजे काय हे सांगायला अडचण येणार नाही. पण आमची सर्व काळजी आता मिटली आहे. अतिशयोक्ती अलंकाराचे अतिशय सुरेख उदाहरण आमच्यासमोर आहे.


होय , हा मराठीतला पहिला संपूर्ण ऑनलाइन दिवाळी अंक आहे. आजवर ऑनलाइन दिवाळी अंक अनेक झाले. पण प्रत्येकानं स्वतःच आपली कुंपणं आखून घेतली होती. आता ही कुंपणं उचकून टाकण्याची वेळ आहे. मराठी ऑनलाइन म्हणजे फुटकळपणा , या समजाला मुळापासून गाडून टाकत , दर्जाच्या मैदानात छापील दिवाळी अंकांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचा हा प्रयत्न आहे.


अधिक माहितीसाठी हे पहा.

स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून मायबोली, मनोगत, उपक्रम, मिसळपावासारखी दर्जेदार संकेतस्थळे चालवणारे संकेतस्थळचालक. त्यांनी राबवलेले दिवाळीअंकांसारखे सुंदर उपक्रम. अतिशय गुणी माणसांशी ऑनलाईन ओळखी, गप्पाटप्पा, काव्यशास्त्रविनोद करण्याची दिलेली संधी. हे सगळे फुटकळ.
आणि आपले 'उत्पादन' अधिकाधिक 'ग्राहकांपर्यंत' पोचवण्यासाठी अशुद्धलेखनाने बुजबुजलेले, हिंदाळलेले मराठी. अर्धवस्त्रांकित उठवळ नट्यांची चित्रे पहिल्या पानावर छापणारे हे वृत्तपत्र तेवढे दर्जेदार ही अतिशयोक्तीच नाही का?
असो.
आम्हाला जास्त काही म्हणायचे नाही. त्या वृत्तपत्राला एकच सांगायचे आहे.
तुम्ही ओळखलेच असेल काय ते.
बरोब्बर.
'चड्डीत राहा ना भो'

Thursday, December 6

बम भोले बम

मोठमोठ्या चित्रपट कलाकारांशी (म्हणजे अमिताभ व शाहरुख) आमच्या फार ओळखी.

दुपारचे जेवण करून पान खाण्यासाठी पानाच्या गादीवर आलो तर तिथे शाहरूख. आश्चर्याने आम्ही तोंडातच बोट घातले. म्हणजे शाहरूख दिसला त्याबद्दल नाही तर त्याने शर्ट घातला होता त्याचे आश्चर्य वाटले. आय हाय "दर्द ए डिस्को". काय डान्स केलाय! मान गये. आम्हीही शर्टाची दोन बटणे काढून त्याला नाचण्याची हुक्की आली तर साथ देण्यासाठी तयार राहिलो.

गोल्डफ्लेक पेटवून शाहरूखने १ रुच्या दोन मेंटॉस घेतल्या. आम्ही पटकन तोंडातले बोट काढून मेंटॉस घेण्यासाठी हात (पुसून) तयार ठेवला. पण त्याने मेंटॉस (स्वत:च्या) खिशात टाकल्या.

आम्ही १२०-३०० हातात घेऊन बोटावर चुना घेतला आणि शाहरुखला दोन्ही हात वर करून प्रणाम केला.

"नमो नम:"

"वालेकुम अस्सलाम!", शाहरूख बाकी संस्कारांचा पक्का.

"कॉम मॉम मम माअयं?" आम्ही पान खाऊन चुन्याचे बोट तोंडात खुपसले.

शाहरूखने फक्त भुवई वर करून प्रश्नार्थक चेहरा केला.

"काय मग कसं चाललंय?", आम्ही.

"एएएएएए... काही नाही. निवांतच आहे.अम्म अम्म" धुराचा झुरका तोंडातून सोडत शाहरूख.

"बाकी पिक्चर मस्तच चाललंय. विशेषत: शर्ट वगैरे नाही म्हणजे खासच. पण हे शर्टाचं काय काढलंय मध्येच?" नसत्या काड्या घालायची आमची सवय जाणार नाही.

"एएएएएए.. शर्टाचं कुठे काढलंय. शर्टच काढलंय की! अम्म अम्म" शाहरूखची विनोदबुद्धी त्याला दगा देत नाही.

"हा हा. +१! मस्त. " प्रतिसाद कुठे आणि कसा द्यावा ते आम्हाला बरोबर कळते.
"थोडीशी कॉम्पीटिशन आहे पण बाकी धोधो चाललाय की!", इति आम्ही.

"कॉम्पीटिशन? कसली कॉम्पीटिशन?" शाहरूख थोडा चिडला.

"अहो 'चक दे' ची. गैरसमज नको.", बाजू सावरणे आम्हाला बरोब्बर जमते.

"एएएएएए... तो होय. घ्या मेन्टॉस घ्या." शाहरुख अपेक्षेप्रमाणे पाघळला.

पटकन हात पुढे करून मेन्टॉस खिशात घातली आणि आम्ही एक काडी सारली.

"हा आता पुढे काय नवे प्रोजेक्ट्स वगैरे?"

"एक पिक्चर काढतोय. ऑस्कर नक्की मिळणार बघा. पिक्चरला नाही तर मला नक्कीच.", शाहरूख

"ते तर आहेच. तुम्ही असल्यावर काय अशक्य आहे. तुम है तो क्या गम है? आणि तुम्हाला ऑस्करची काय गरज? खर्‍या हिर्‍याला तळपण्यासाठी कोंदणाची गरज थोडीच असते." नको त्या वेळी आमच्यातला लेखक बाहेर येऊ पाहतो. खरे म्हणजे आम्हालाही ज्ञानपीठ मिळायला हवा. ते असो.

"काय नाव काय आहे पिक्चरचं. कॅची पाहिजे बुवा. ओएसओ, के३जी सारखं.", आम्ही.

"एएएएएए... . बास बास. आपले विचार जुळतात. नाव तर जबरदस्तच आहे. बम-भोले-बम. ३बी म्हणता येईल. किंवा बी३. बघूया आकडेतज्ज्ञ काय सांगतात ते."

"राग मानणार नसाल तर एक विचारू का?" आता मेन्टॉस मिळाल्यामुळे आमचा कार्यभाग साधला होता.

"एएएएएए... असं काय? विचारा ना.शरमाओ मत. आम्ही तुम्हाला परके थोडेच मानतो. "

"ओएसओ मध्ये शर्ट काढला. आता या चित्रपटात तुम्ही प्यांट काढणार का?"

Wednesday, November 28

कन्नडा हाडु

दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्‍या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच इतर भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय!
उदा. कन्नड भाषेतील खालील लोकप्रिय गाणे पहा. (बहुतेकांना नुसतेच पहावे लागेल, वाचता येणार नाही. पुन्हा एकदा हाय!)

आम्हाला संपूर्ण कल्पना आहे की कन्नड भाषेतील उच्चारांचा गोडवा देवनागरीमध्ये उतरणे शक्य नाही. उदा पत्नी आपल्या पतिला "री" अशी जी गोड लाडिक हाक मारते त्याची री मराठीत ओढता किंवा लिहिता येणे सर्वस्वी कठीण.

पण व्याभिचारी आस्वादाला आमचा पाठिंबा आहे. या गाण्याचे देवनागरीतील भ्रष्ट उच्चार व मराठीतील अर्थ प्रत्येक कडव्याखाली देत आहोत. बघा आवडतो का ते.



ಅನಿಸುತಿದೆ ಯಾಕೊ ಇಂದು..ನೀನೇನೆ ನನ್ನವಳಿದ್ದು
ಮಾಯದ ಲೋಕದಿಂದ..ನನಗಾಗೆ ಬಂದವಳಿದ್ದು
ಆಹಾ ಎಂಥ ಮಧುರ ಯಾತನೆ
ಕೊಲ್ಲು ಹುಡುಗಿ ಒಮ್ಮೆ ನನ್ನ..ಹಾಗೆ ಸುಮ್ಮನೆ
ಅನಿಸುತಿದೆ ಯಾಕೊ ಇಂದು..

अनिसुतिदे याको इंदु.. नीनेने नन्नबळिंदु
मायदा लोकदिंदा...ननगागे बंदबळिंदु
आहा एंथा मधुरा यातने
कोल्लु हुडुगि ओम्मे नन्ना... हागे सुम्मने
अनिसुतिदे याको इंदु


मला हे असे आज का वाटत आहे कोण जाणे
की केवळ तूच एक माझ्यासाठी आहेस
मायावी दु