अतिप्रिय च्यानेलांनो,
मुंबईमध्ये झालेल्या घृणास्पद दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतीय सैनिक, राष्ट्रीय सुरक्षा दल आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यापेक्षाही जास्त शौर्य कोणी दाखवले असेल तर ते तुमच्या वेगवेगळ्या व्यवसायनिष्ठ वाहिन्यांनी. क्रिकेट कॉमेंट्रीप्रमाणे किती विकेटी पडल्या याचे थेट प्रक्षेपण आणि रनिंग कमेंट्री , प्रत्येक मिनिटाला काय घडत आहे हे दाखवण्याची तळमळ, या दहशतवादी हल्ल्यांच्या 'विश्लेषणा'मुळे आणि एकंदर कव्हरेजमुळे हा हल्ला जितका होता त्यापेक्षा खूप मोठा करून दाखवण्याची कामगिरी, आणि या सर्व प्रकारामुळे एकंदर भारतीयांची हतबल आणि हतधैर्य अशी अवस्था करण्याचे मोठे श्रेय या तुमचेच नाही का... आणि तुम्ही हे सर्व कोणासाठी केले? टीव्हीसमोर बसून फक्त आपले बूड उबवणाऱ्या आमच्यासारख्या प्रेक्षकांसाठीच ना? ही माहिती न मिळते तर आम्हाला घास गोड लागला असता का? आणि हे सर्व दाखवले नाही तर आम्ही काय बघणार? (सास भी कभी बहू थी सुद्धा बंद झालं आहे... आता जमाना रिऍलिटी टीव्हीचा आहे भाऊ). "अगं ए जरा आमटी वाढ थोडी" असं म्हणताना तुमच्या बातम्यांची चटणी तोंडी लावायला बरी असते..
ता. क. शिवाय दुसऱ्या दिवशी मुंबईत न झालेल्या गोळीबाराची बातमी दाखवून तुम्ही प्रेक्षकांची किती काळजी आहे हे देखील सिद्ध केले आहे त्याबद्दल विशेष अभिनंदन. हेमंत करकरे आणि अशोक कामठे यांच्या अंत्यसंस्कारांपासूनही आम्हाला वंचित ठेवले नाही हेदेखील उल्लेखनीय आहे.
तुमची कर्तव्यनिष्ठा, गोळीबार आणि स्फोटांची पर्वा न करता बाईट घेण्यातले अतुलनीय शौर्य, तुमच्या बातम्यांचा प्रेक्षकांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल याचा विचार न करण्याची स्थितप्रज्ञता हे सर्व विसरून जाऊ नये अशीच माझी इच्छा आहे. म्हणून हे पत्र लिहीत आहे.
-तुमचाच एक चाहता.
Saturday, November 29
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

1 प्रतिसाद:
हे अग्ी ब्रोर आहे.
टिप्पणी पोस्ट करा