Monday, February 4

शाळा

आमच्या सुपरष्टारला कोणीही (स्टुलावर उभे राहून) टपली मारावी आणि त्याचे केस विस्कटवून टाकावे याला काय म्हणावे?

राजसाहेबांनी केलेल्या वक्तव्याने आमचे मन इतके दुखावले तर सुपरष्टार साहेबांचे किती दुखावले असेल याची कल्पनाच करवत नाही. आम्ही तडक 'बंगल्या' वर पोचलो. जयावैनी फोनवरून डायलॉग लिहून घेत होत्या. मात्र आम्हाला पाहून गडबडीने फोन खाली ठेवून "या या" म्हणाल्या.

आम्ही अचंबित!

"बसा, बसा. थोडा चहा टाकते.", जयावैनी.

"चहा तर टाकाच. थोडं आलंही टाका. ठेचून! काय थंडी आहे. हू हू हू हू.". फुकट मिळते तर सोडायचे कशाला अशी आमची (सुपरष्टारप्रमाणेच) पॉलिसी आहे.

"आलं? कोण आलं?" जयावैनी घाबरल्या. त्यांना वाटलं 'कार्यकर्ते' आले की काय!

"अहो. कोणी आलं नाही. आलं म्हणजे जिंजर! अहो, अद्रक अद्रक! बंदर क्या जाने अद्रक का स्वाद असं तुम्ही म्हणता ना! आम्हाला आवडतो बाबा त्याचा स्वाद! विशेषत: अशा थंडीत चहा काय मस्त लागतो."

"छ्या. ही काय थंडी आहे! थंडीची खरी मजा तर आमच्या उत्तर प्रदेशात." आजूबाजूला 'कार्यकर्ते' नाहीत हे पाहून जयावैनींनी मनातली गोष्ट सांगितली.

"हे बाकी खरं बोललात! 'पुनर्जन्म हो मेरा तो हो गंगा के तटपर!' असं कुणीसं म्हटलंच आहे. असो. चहाला उकळी आली असेल. उतू जाईल. बाकी 'शिक्षणमहर्षी अमितजी' कुठे दिसत नाहीत?", आम्ही.

"बाराबंकीला गेलेत. विटांची डिलीव्हरी यायची होती. लवकरात लवकर काम पुरं करावं म्हणते. गुढीपाडव्याला झालं तर सोन्याहून पिवळं. तेवढंच विरोधकांचं तोंड बंद राहील.", जयावैनी.

"त्याचीच युक्ती सांगायला आलो होतो ना! म्हटलं विटांचा एखादा ट्रक महाराष्ट्रातून न्या. नंतर उगीच बोंबाबोंब नको.", आम्ही.

जयावैनी चहा आणायला आत गेल्या. आम्ही फोनजवळ जाऊन कोणत्या चित्रपटाचे डायलॉग आहेत ते पाहू लागलो. वडील, भाऊ असे काहीतरी लिहिले होते. बहुधा चित्रपट कौटुंबिक असावा.

चहा घेऊन घरी आलो आणि संध्याकाळी टीव्हीवरच्या बातम्या पाहू लागलो तर काय चमत्कार!

आम्ही फोनजवळ वाचलेले डायलॉग जयावैनी पत्रकारांसमोर मारत होत्या!!

ही नवीनच शाळा म्हणायची.

आम्हाला इतुके दिवस फक्त 'मातोश्री' माहिती होत्या. शाळेत न जाता तातश्री आणि दादोश्री हे देखील शिकलो.

असो.