Monday, January 28

नेमाड्यांशी गप्पा

स्टार माझावर काल नेमाड्य़ांशी गप्पा या नावाने एका कार्यक्रमात भालचंद्र नेमाड्यांशी मारलेल्या गप्पा पाहण्यात आल्या.

एक तर स्टार माझा (किंवा झी २४) ह्या वाहिनीवरचे मराठी इतके भयंकर असते की आपण इतकी वर्षे जी भाषा शिकलो, लिहितो, वाचतो ती वेगळीच कोणती तरी आहे आणि ह्या वाहिनीवरची भाषा वेगळीच आहे असेच वाटत राहते. घरंगळलेले अनुस्वार व रफार यांचा सुकाळ करून काय बातमी देण्याचा प्रयत्न करतात तेच कळत नाही.

सूचना हा शब्द "सुचना" असा लिहिणे. 'कायर्क्रम' सारखे जिभेला मल्लखांब खेळायला लावणारे शब्द दाखवणे हे प्रकार पाहून मनोरंजन होत असले तरी ते फारसे आनंददायी नसते. शिवाय शाहरूख खान पुढील चित्रपटात प्यांट घालणार की नाही अशा गहन आणि अतिमहत्त्वाच्या 'मराठी' विषयांवर अर्धा अर्धा तास विश्लेषणात्मक चर्चा करून नंतर काहीही निष्कर्ष न काढता प्रेक्षकांवर (त्यांच्या भाषेत दर्शकांवर) एसएमएस पाठवण्याची लाडिक सक्ती करण्याची दृश्ये पाहण्यात मला काहीही रस नसतो. त्यात अजून एक संतापजनक प्रकार म्हणजे ह्या वाहिनीवर बातम्या सांगणारी निवेदिका आहे ती पाठीत स्प्रिंग बसवल्याप्रमाणे इतकी मान हलवते की या बातम्या मूव किंवा आयोडेक्सने स्पॉन्सर करायला काहीच हरकत नाही असेही वाटून जाते. (स्टारवाले, ह्या युक्तीचे पेटंट मला द्या!)

त्यामुळे या वाहिनीला नेमाडे कोण असावेत हे माहिती असणे हीच मोठी आश्चर्याची बाब होती. त्यात नेमाड्यांशी गप्पा हा कार्यक्रम दाखवणे हा सुखद अपेक्षाभंगाचा कळसच होता. गप्पांचा सुरुवातीचा काही भाग चुकला.

नेमाड्य़ांच्या "मी आधीच सांगितल्याप्रमाणे आपण आपली भाषा, राष्ट्र, धर्म या मूळ ओळखी आहेत त्या स्वत:कडे जपून ठेवायला हव्यात" अशा काहीशा वाक्याला मी कार्यक्रम बघायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना नक्की कोणत्या संदर्भात हे वाक्य म्हणायचे होते ते कळलेच नाही. (नेमाड्यांसारखे मोठे लेखक असे न कळणारे नेहमी बोलतात त्यामुळे कोणीही न कळणारे काहीही बोलले की ते थोर वाटू लागते! असो.) मात्र पुढे नेमाड्यांनी केलेली टोलेबाजी झकास होती.

"व्ही.एस.नायपॉल, सलमान रश्दी यासारख्या लेखकांना काहीही महत्त्व देण्याची गरज नाही. ते लोक ब्रिटिशांनी त्यांना चांगले म्हणावे या दृष्टिकोणातून भारताला शिव्या घालतात. आपल्याला जशी तस्लीमा नसरीन जवळची वाटते. (ती बांगलादेशातील मुसलमानांना नावे ठेवते म्हणून) तसेच ब्रिटिशांना किंवा युरोपियनांना नायपॉल, रश्दी हे जवळचे वाटतात. एन आर आय लोकही असेच आहेत. त्यांच्याकडून फारशा अपेक्षा ठेवू नयेत. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या प्रथांना, परंपरांना केवळ आपल्या मनात येते म्हणून नाव ठेवू नये. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मी पुरस्कर्ता आहे पण समाजात पिढ्यानपिढ्या चालणार्‍या गोष्टींना, श्रद्धास्थानांना ती डळमळीत होतील इतपत नावे ठेवण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नसतो.

पेपरात लिहिणारे लोक संपूर्णपणे मूर्ख असतात. ज्यांना काहीही अक्कल नाही असे लोक संपादक होतात आणि इतरांना शहाणपणा शिकवतात. त्यामुळे पेपरवाल्यांकडे लक्ष देऊ नये. जातीधर्म या गोष्टी नष्ट करणे वर्षानुवर्षे कुणालाही जमले नाही त्यामुळे त्या नष्ट करण्याच्या बाता मारू नयेत."


वगैरे वगैरे. झकास.

पण शेवट फारच दमदार होता. अनेक वर्षे वाट पाहत असलेला त्यांचा "हिंदू" हा ग्रंथ कधी प्रकाशित होणार असे विचारले तर "तुम्ही असे कार्यक्रम आयोजित करुन माझे साडेचार पाच तास वाया घालवता. एवढ्या वेळात माझी थोडी पाने लिहून झाली असती. पण तरी तीन चार महिन्यात तो ग्रंथ तयार होईल. (लिहून की छापून?)"

खल्लास!!

8 प्रतिसाद:

निलेश म्हणाले...

नेमाड्यांच्या भाषणाला नेहमीच शॉक व्हॅल्यू असते. ;)

Ajit म्हणाले...

तुमच्या शीर्षकात लिहिल्यापम्राणे [sic] यात नेमाड्यांशी 'गप्पा' तुम्हाला सापडल्या? गप्पा म्हणता यावे यासाठी ५०-५० नाही तरी ४०-६०% सहभाग दोन्ही पार्ट्यांचा असला पाहिजे ना! इथे तर सगळा वन वे ट्रॅफिक वाटत होता :-)

पेपरात लिहिणारे लोक संपूर्णपणे मूर्ख असतात. ज्यांना काहीही अक्कल नाही असे लोक संपादक होतात आणि इतरांना शहाणपणा शिकवतात.
कमाल आहे नाही? लिहिणारे लोक संपूर्णपणे मूर्ख आणि ते जे लिहितात ते वाचणारे?!

Abhijit Bathe म्हणाले...

सही रे योगेश - नेमाड्यांची ही किंवा अशीच कुठली मुलाखत कुठे सापडली आणि ’यु-ट्युब’ वर वगैरे टाकता आली तर बघ ना!
अवचटांचे लेख नेटवर उपलब्ध करुन देण्याबद्दल तु त्यांच्याशी कधी बोललायस का? (किंवा परत कधी भेटायचा योग असेल तर विचारशील का?)

Meghana Bhuskute म्हणाले...

afalaatoon lekh. maja ali. content ani style donhi 'zyak'!

Yogesh म्हणाले...

@निलेश
टीव्हीवर का होईना पण हालत्याबोलत्या नेमाड्यांना प्रथमच पाहिले तोच धक्का खूप मोठा होता.

@अजित
खरं तर तो वन वे ट्राफिक नव्हता. मुलाखत घेणारे प्राध्यापक, नेमाड्यांना "तुम्हाला रश्दींविषयी काय वाटतं", "एन आर आय विषयी काय वाटतं" असे फुलटॉस टाकत होते त्यामुळे नेमाड्यांना प्रत्येक चेंडूवर षटकार मारता आला ;)

@अभिजित,
नेमाड्यांची मुलाखत स्टार माझा बातमीपत्रावर होती. यूट्यूबवर किंवा त्यांच्याच साईटवर त्यांनी द्यायला काही हरकत नाही.
अवचटांचं म्हणशील तर पुस्तकं ऑनलाईन यायला पाहिजेत खरी. ते स्वत:ही लगेच तयार होतील. पण त्यांना असा प्रश्न विचारणे फार संकोचाचे काम आहे. फार कॉम्प्लिकेशन्स होतील त्यात. प्रकाशकांचे कायमचे बूच लागून जाईल. पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध झाली की विकत कोण घेणार?

@मेघना
धन्यवाद. उत्तरार्ध संपूर्ण नेमाड्यांचाच आहे.

Raj म्हणाले...

मस्त. इतकी शॉकिंग मिलाखत बघायला मिळाली नाही त्याचे वाइट वाटते आहे. नेमाड्यांचा शेवटचा सिक्सर तर धमालच. :)

HAREKRISHNAJI म्हणाले...

just perfect

Nandan म्हणाले...

धमाल गप्पा होत्या एकूण :). नशीब मुलाखत घेणारी कोणी लाडिक निवेदिका नव्हती. नाहीतर ’फारीच फटकळ बुवा तुम्ही’, या प्रशस्तीपत्राने नेमाडेंचा स्फोट झाला असता :). बाकी, मूळ ओळखी जपून ठेवण्याबद्दलचे त्यांचे उद्गार बहुतेक समीक्षेतील देशीवादाबद्दलचे असावेत.