माझ्या सोसायटीत बीएसएनएलची टेलिफोनसेवा उपलब्ध नाही त्यामुळं त्यांची ब्रॉडबॅंड सेवा इच्छा असली तरी घेणं शक्य नाही.
टाटा इंडिकॉमवाल्यांच्या सेवेबद्दल मी एकदोन जण वगळता कुणाकडून चांगलं ऐकलं नव्हतं. (आणि रिलायन्सच्या सेवेबद्दल कुणाकडूनच चांगलं ऐकलं नव्हतं.) त्यात परत दोघांची तुलना केली तर टाटा इंडिकॉमने सेवेची प्रतिष्ठापना करण्यासाठीचे शुल्क (रू ५०० - एकदा भरल्यावर परत मिळणार नाहीत) दयाळूपणाने माफ केलं होतं.
टाटा इंडिकॉमचा फॉर्म भरून दिला. "दोन दिवसात कनेक्शन जोडून मिळेल" असं तोंडभरून आश्वासन देऊन फॉर्म भरून घेणारा प्रतिनिधी निघून गेला.
एक आठवडा झाला तरी जोडणी करुन द्यायला कोणीही आलं नाही. या काळात त्यांच्या कॉल सेंटरला आणि अर्ज भरून घेणार्या प्रतिनिधीला (माझ्या ऑफिसच्या सौजन्याने) अनेक फोन करुन झाले.
"तुमचा अर्ज मिळालाच नाही." पासून "आत्ता दुपारी जोडणी करण्यासाठी आम्ही निघालोच आहोत" पर्यंत सर्व उत्तरे मिळाली.
एक तर प्रतिष्ठापना करण्यासाठी पैसे न भरल्यामुळं तसं हुरहुर वाटायचं काही कारण नव्हतं. पण ब्रॉडबॅंड सेवेचा घरबसल्या अनुभव घेण्यासाठी मी अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्यामुळं आपली काही तरी महत्त्वाची वस्तू आपल्याजवळ नाहीये असं विचित्र काहीतरी वाटत होतं
पुन्हा एकदोन दिवस वाट बघून रिलायन्सच्या प्रतिनिधीला फोन केला. तर साहेबांना मराठी बोलता येत नव्हतं. पण कळत होतं त्यामुळं नाना पाटेकरच्या मुलाखतीप्रमाणे मी मराठीत व तो हिंदीत असा संवाद साधावा लागला.
रिलायन्सच्या योजनाही टाटा इंडिकॉमप्रमाणेच असल्या तरी प्रतिष्ठापना करण्यासाठी गुरुजींना ५०० रुपये दक्षिणा देणे भाग होते. इथे अर्ज भरून दिला आणि सोबत ५०० रु. चा चेक जोडून दिला. पुन्हा एकदा "दोन दिवसात कनेक्शन जोडून मिळेल" असं तोंडभरून आश्वासन देऊन फॉर्म भरून घेणारा प्रतिनिधी निघून गेला.
पुन्हा एकदा पहिले पाढे पंचावन्नची उजळणी झाली. आठवडाभर काहीही प्रतिसाद नाही. प्रतिनिधी आणि कॉलसेंटर दोघांकडून खालील उत्तरे मिळाली.
१. कॉलसेंटर: तुमचा अर्ज मिळालाच नाही.
२. कॉलसेंटर: अर्ज मिळाला पण आमचा डेटाबेस डाऊन आहे. त्यामुळे तो अजून सिस्टीममध्ये आलेला नाही.
३. कॉलसेंटर: तुमची माहिती सिस्टीममध्ये आहे पण वर्क ऑर्डर निघाली नाही.
४. प्रतिनिधी: राउटर्स संपले आहेत. आज दुपारी येतील.
५. प्रतिनिधी: केबल नाहीत. नवीन फायबर ऑप्टिक केबल्स येतील. थोडं थांबलात तर तुम्हाला चांगलं स्पीड मिळेल.
६. कॉलसेंटर: शनिवार-रविवार आम्ही प्रतिष्ठापनेचे काम करत नाही. (हे लोक देखील मुहूर्त बघूनच कामं करतात!)
७. प्रतिनिधी: तुमचं काम अग्रक्रमाने घेऊन रविवारीच करून देऊ.
दरम्यानच्या काळात टाटा इंडिकॉमला मी दुसरे कनेक्शन घेत आहे वगैरे कळवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन लागत नव्हता. शिवाय त्यांचाकडूनही २ आठवडे झाले तरी काहीही प्रतिसाद नाही.
एकदोन दिवसांनी रिलायन्सचे जोडणी करणारे लोक घरी येऊन वायर वगैरे लावून, "सर्वर चालू करून येतो असं सांगून परत १-२ दिवस आलेच नाहीत. शिवाय त्यांनी तोपर्यंत राउटरही आणला नव्हता.
रिलायन्सच्या प्रतिनिधीला या सर्व काळात नियमितपणे फोन करून मी "उद्यापर्यंत कनेक्शन मिळाले नाही तर मी कनेक्शन घेणार नाही. माझा चेक परत देऊन टाका" वगैरे सांगत होतो.
अर्ज भरून झाल्याच्या तब्बल १३ व्या दिवशी रविवारचा मुहूर्त पाहून प्रतिष्ठापना करणारे गुरुजी आले आणि त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिष्ठापना करुन ब्रॉडबॅंड सेवा चालू करून दिली.
सेवा चालू झाल्यानंतर मात्र अद्याप कोणतीही अडचण आलेली नाही. वेग उत्तम आहे. जोडणी मिळेपर्यंतचा त्रासदायक अनुभव वगळता सेवा समाधानकारक आहे.
श्री अनिल अंबानी,
तुम्ही (नटनट्यांच्या लग्नाच्या व इतर पार्ट्यांमध्ये हजेरी लावून पेज थ्री वर फोटो छापून आणण्यापेक्षा) विक्रीपूर्व सेवेकडे जरा अधिक लक्ष द्याल तर आपल्या सर्वांसाठी ते बरे होईल अशी एक कळकळीची विनंती करतो.
आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या कंपनीत पैसे गुंतवले आहेत. ह्या विश्वासाला आपण पात्र व्हावे हीच इच्छा.
एक चिंताग्रस्त गुंतवणूकदार आणि रिलायन्स ब्रॉडबॅंड सेवेचा ग्राहक






