Friday, November 2

उघडझाप

हातकणंगलेकरांचं स्वतंत्र लेखन मी फारसं वाचलं नाही. बारावीत असताना अभ्यासाचा कंटाळा आला - तसा तो नेहमीच यायचा म्हणा - की ग्रामपंचायतीच्या लायब्ररीतून पुस्तकं आणून - आईवडिलांचे लक्ष चुकवत - वाचणे चालू होते. नेमका त्याचवेळी प्रोफेसर लोकांचा संप असल्याने कॉलेज बिलेज काही नसायचं. त्यात गावाकडं कोचिंग क्लासेसचाही त्रास नव्हता. त्यामुळे पुस्तकं वाचायला भरपूर मोकळा वेळ मिळायचा. हातकणंगलेकरांचं नाव पहिल्यांदा वाचलं ते "डोहकाळिमा" या जीएंच्या निवडक कथांचे संकलक/संपादक म्हणून. संध्याकाळी ८ वाजता एक पुस्तक बदलून "डोहकाळिमा" आणलं होतं. लोडशेडिंग ऊर्फ भारनियमन चालू असल्याने नेहमीप्रमाणे लाईट नव्हती. तेव्हा त्या पुस्तकाची हातकणंगलेकरांनी लिहिलेली प्रस्तावना कंदिलाच्या प्रकाशात वाचली होती. मध्ये जेवायला उठलो असेल तेवढाच. प्रस्तावना वाचून संपली तेव्हा रात्रीचे १२ वाजून गेले होते. काहीतरी खूप चांगलं, अभ्यासपूर्ण पण तरीही बोजड नसलेलं, अगदी गुंगवून टाकणारं वाचल्यानंतर येतो तसा थकवा आला होता. "डोहकाळिमा" तील मूळ कथा वाचल्यावर हातकणंगलेकर लक्षातही राहिले नाहीत.

हातकणंगलेकरांची फारशी पुस्तकं लायब्ररीत नसल्याने पुढे वाचायलाही मिळाली नाहीत. गेल्या एक दोन वर्षात त्यांनी संपादित केलेल्या जीएंच्या पत्रांचे ४ खंड वाचले नसते तर त्यांना विसरूनही गेलो असतो कदाचित.

मागच्याच महिन्यात एका पुस्तक प्रदर्शनात त्यांचं आत्मनिवेदनात्मक "उघडझाप" हे पुस्तक सापडलं. अर्थात ते पुस्तक विकत घेण्याचं कारण त्यातला "जीए नावाचं कोडं" हा लेखच होता. पण पुस्तकातून हातकणंगलेकरांची खूप वेगळी ओळख पटते. "नॉन जीए" असलेलं त्यांचं स्वतंत्र लेखन किती चांगलं आहे हे त्यांच्या "उघडझाप" याच लेखातील खालील उतारा वाचून कळेल.

उघडझाप


"गेल्या पंचाहत्तर वर्षांच्या काळाच्या प्रवाहाकडे तटस्थतेच्या टोकावरून पाहताना काय आठवते? अनेक आठवणी अंत:चक्षूंसमोर सरकतात. कोल्हापूरला गेलेले वडील रात्री आठच्या गाडीने परत येणार असतात. त्यांची वाट पाहत पेंगुळलेल्या डोळ्यांनी आजीच्या मांडीवर डोके टेकून मी पडलेला असतो. समोरच्या खोलीच्या चौकटीला कंदील टांगलेला आणि त्याची तांबूस पांढरी ज्योतच तेवढी डोळ्यांत भरत राहिलेली. पांढर्‍या वस्त्रांत लपेटलेली पिकल्या केसांच्या आजीची गोरीपान, सुंदर सुरकुत्यांनी रेखलेली आकृती. तिने सांगितलेल्या इसापाच्या, हातिमताईच्या, वेताळपंचविशीतील गोष्टी, पानाने रंगलेले तिचे पातळ ओठ आणि कुठल्या अज्ञातात पाहणारे तिचे स्थिर डोळे. स्टेशनात येऊन थांबलेल्या आगगाडीचे उसारे, पानकाडीबिडीचे आवाज देणारा स्टेशनावरचा पोर्टर आणि मग बराच काळ करावी लागणारी ओळखीच्या पावलांची मन ताणून केलेली प्रतीक्षा, कोपर्‍यावर वाजलेली वडिलांची पावले आणि त्यांच्या कमरेवरच्या किल्ल्यांचा आवाज आणि नंतर दारातून अवतरणारी त्यांची पावले आणि घर भरून पावल्याचा आभास, कुणीतरी गादीवर आणून ठेवणे, स्नान करून देवापुढे उघड्या, देखण्या पाठीने बसलेले वडील, उदाचा उदात्त वास, त्याच्या धुराची अनंताकडे झेपावणारी वलये आणि नंतरची गाढ झोप- खिडकीतून उन्हे आल्यानंतरच हलकेच संपणारी. हे चित्रच आयुष्यभर स्थिर झाले असते तर केवढा सुखाचा ठेवा मी जतन करत जगलो असतो. कुठलेच सुख स्थानबद्ध करून ठेवता येत नाही हेच माणसाचे कारुण्यगर्भ भागधेय.

आमच्या घराचे दोन भाग होते : पाठीमागे स्वयंपाकघर, पाण्याचा आड, जनावरांचा गोठा आणि मधल्या जागेत फरसबंदी चौक. उन्हे कलायला सुरुवात झाल्यापासून माझा मुक्काम या उबदार फरशीवर असायचा. मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची चाहूल. आजी ताज्या पालेभाजीला फोडणी देऊन, गरम भाकरी , तिखट, दही असे ताट करून मला या फरशीवरच जेवण द्यायची. झुंझुरक्या चंद्रप्रकाशात या अन्नाला अवीट गोडी प्राप्त होत असे. सोन्याचा घास म्हणतात तो हाच! त्यानंतर आयुष्यात तर्‍हतर्‍हेचे पदार्थ चाखले पण बालपणातल्या या भाजी-भाकरीची चव विसरता आली नाही.

पुढे व्यंकटेश माडगूळकरांची एक कथा वाचली : शिकारीला गेले असता ते एका पारध्यांच्या पालावर संध्याकाळच्या वेळेला पोचतात. रात्रीचे जेवण तव्यावर तयार होत असते. कोणता तरी पक्षी भाजला जात असतो. त्याचा खमंग वास सुटलेला. “काय शिजवता?” माडगूळकर विचारतात. “गिधाड गावलं मालक!” “ काय? तुम्ही गिधाडदेखील खाता?” “ तर काय, फार चवदार असतं मालक, उलिसं तेल घालून, लसूण टाकून भाजला की अक्षी चवदार!” लहानपणातल्या माझ्या जेवणाची अशीच रूची असावी. पदार्थ वेगळे पण अनुभव तसाच. “