Thursday, November 15

बोधकथा

बोधकथा - १

एकदा एक माणूस मित्राकडे जेवायला गेला.
मित्राच्या बायकोने फार सुंदर जेवण बनवले होते.
इतके चांगले जेवण कसे काय बनले हे मित्राने विचारले तर मित्राची बायको म्हणाली, "आज चिमूटभर टाकलेलं मीठ बरोबर पडलंय, त्यामुळे जेवण बरं झालंय"तो माणूस खूष झाला.चिमूटभर मिठामुळे जर जेवण इतके चांगले झाले, तर प्रत्यक्ष मीठ किती सुंदर लागत असेल. असा विचार करून त्याने बचकभर मीठ तोंडात घातले.


बोधकथा - २
एकदा नारदमुनी सहज फिरत फिरत पृथ्वीवर आले. आणि जाता जाता काही सत्कार्य करावे म्हणून उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या एका नागोबाला "तू लोकांना चावत जाऊ नकोस, त्रास देत जाऊ नकोस, म्हणजे तुझ्या पापाचा संचय कमी होईल व त्यामुळे रक्तदाबही कमी होईल." असे सांगितले.
पाचसहा महिने गेले. लीव्ह ट्रॅव्हल अलाऊन्स एन्कॅश करण्यासाठी पुन्हा रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले. इथे येऊन पाहतात तो काय अगदी पोरासोरांनीही दगड, खडे मारून मारून नागोबाला अगदी बेजार केलेले. तो अगदी मरणोन्मुख होऊन पडला होता.
नारदमुनी जवळ येताच तो म्हणाला, "माझ्या ह्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही सांगितल्यापासून मी लोकांना त्रास देण्याचे सोडले आणि माझी परिस्थिती अशी झाली."
नारदमुनी म्हणाले, "अरे मी तुला चावत जाऊ नकोस असे सांगितले होते. पण स्वसंरक्षणासाठी तू निदान फुत्कार तरी टाकू शकतोस."

नारदमुनींच्या पुढच्या यलटीए ट्रीपच्या वेळी नागोबा टुमटुमीत होता.
तात्पर्यः फुत्कार टाकण्याने जे काम होते त्यासाठी चावण्याची काय गरज?

बोधकथा - ३
नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.)
पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा. पण डुकरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून त्याला आपण वराहगंधर्व म्हणूयात. कसें?
नारदमुनी म्हणाले, "नारायण, नारायण! हे वराहकुलभूषणा, इथे पृथ्वीवर काय करतोयेस?"
वराहगंधर्व: "हँ हँ, काही नाही, आपले नेहमीचेच"
नारदमुनी: "अरे पण तुझी जागा तर स्वर्गात आहे."
वराहगंधर्व: "का? स्वर्गात काय आहे?"
नारदमुनी: "अरे स्वर्गात अमृतफळे लागणारी झाडे, दुधातुपाच्या नद्या, मधूर कूजन करणारे पक्षी आहेत."
वराहगंधर्वः "मग?"
नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर."
वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?"
नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?"
वराहगंधर्वः "छे छे, मग मी स्वर्गात येऊन काय करू. मला याच गोष्टी अतिप्रिय आहेत. मला स्वर्गात यायचे नाही. लई बिल झाले. मारा डबल आणि निघा."

असो.
नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे काल्पनिक.