Thursday, April 24

रेडिओ मिरची आणि संत तुकाराम

रेडिओ सिटी सुरू झाल्यामुळे आता रेडिओ मिरचीचे खंग्री बूच लागले आहे. वैतागलेला श्रोतावर्ग टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी त्यांची कंबर कसून प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे 'मराठी' गाणी ऐकवणे हा!

खरं म्हणजे रेडिओ मिरचीवर मराठी गाणी सुरू झाल्याचे मित्राकडून ऐकल्यावर मी बेशुद्ध पडलो होतो. पण चप्पल हुंगवणे, नाकाला कांदा लावणे वगैरे प्रकारांऐवजी रेडिओ मिरची मला ऐकवल्यावर परत शुद्धीवर आलो. नंतर आत्मक्लेश सहन करून एक पूर्ण दिवस रेडिओ मिरचीची गाणी ऐकली पण त्यात मराठी गाणं कुठंच ऐकायला मिळालं नाही.

थोडं खोदून खोदून चौकशी केल्यावर कळलं की सकाळी ५ ते ७ या वेळात 'काही' मराठी गाणी ऐकवली जाणार आहेत. अधिक खोलात गेल्यावर असंही कळलं की रेडिओ मिरचीची आधीची योजना ही रात्री १ ते ३ किंवा रात्री ३ ते पहाटे ५ या वेळात मराठी गाणी प्रसारित करण्याची होती. पण या वेळामध्ये काही गुरखे, रात्रपाळीवरचे कामगार वगैरे जागे असतात. मात्र पहाटे ५ ते ७ या साखरझोपेच्या काळात एकही माणूस जागा असणार नाही याची त्यांनी खात्री करून घेतली. विशेषत: इतक्या उन्हाळ्यात पहाटे जरा गार हवा असल्यावर चांगली झोप लागते तेव्हा ५ ते ७ ही ओळ गाण्यांच्या प्रसारणासाठी उत्तम.

असो.

भणभण गाणी, उबगवाण्या संतापजनक जाहिराती आणि तोंडशिंदळीचे निवेदक असल्यावर रेडिओ मिरची स्वत:हून ऐकणार्‍यांबद्दल काही ठेवणीतले शब्द वापरता येतील. पण मराठीच्या टवाळ्या करून हिंदीच्या चोळ्या धुणार्‍या या तुंग्रुस रेडिओ मिरचीवाल्यांबद्दल आमच्या तुकोबांनी एक अभंग आधीच लिहून ठेवला आहे. आम्हाला तो अभंग फार्फार आवडतो.


संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥
संतासी देखोनि करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥
तुका ह्मणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥

वा!

खरं तर गुटखासंप्रदायी थुंकसैनिकांनी एखादे निषेधात्मक पाणीदार आंदोलन जाहीर करायला पाहिजे.

Sunday, April 20

टिंग्या (Tingya)


टिंग्या हा चित्रपट काल पाहिला आणि कृतज्ञता म्हणून थोडेसे लिहावे वाटले.

शेतात काम करणारा चितंग्या बैल रुतून बसल्यामुळे औताला जोडायला आता दुसरा बैल नाही. घरी बटाट्याचं बियाणं तर येऊन पडलं आहे. लवकर कामं आटपली नाहीत तर मोलामहागाचं बियाणं खराब होईल. याआधीच थकलेल्या कर्जाच्या व्याजाचेही हप्ते पुरते फिटलेले नाहीत. कुठेही मदत मिळण्याची सुतराम शक्यता नाही. किंबहुना आपल्या मेव्हण्याकडे असलेला ट्रॅक्टर मिळवण्याचे व्यर्थ प्रयत्नही करून झाले आहेत.

आमच्या वस्तीत करतो सूर्य टाळाटाळ देवा
गोठला आहे कधीपासून येथे काळ देवा

कोसळाया लागले आहे पुन्हा दाही दिशांनी
बांधले कंत्राटदाराने कुण्या आभाळ देवा?

चित्तरंजन भटांच्या या ओळींची आठवण व्हावी अशी सगळी परिस्थिती. आता या शेतकर्‍याकडे चितंग्याला विकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही. पण चितंग्यामध्ये गुंतलेले टिंग्याचे आतडे त्याच्या पायात अडकत आहे. बैलाला बरे करायला थेट ओतूरपर्यंत धावत जाऊन येणारा टिंग्या त्याच्या जिवाभावाच्या बैलाला कसायाच्या हाती देण्यास राजी होणे शक्यच नाही.

समोरच्या घरातली नानी आता म्हातारी झाली, ती देखील काम करत नाही. पण मग तिला कोणी कसायाला का विकत नाही? चितंग्यालाच का विकायचे या प्रश्नाचे उत्तर टिंग्याला समजत नाही.

गावाकडच्या छोट्या शेतकर्‍यांची परिस्थिती. हिंदू आणि मुसलमान शेजार्‍यांमधले घरगुती कौटुंबिक संबंध, परिस्थितीमुळे भेदरलेल्या या दोन कुटुंबांचे जीवन शैलीदार ग्रामीण भाषेतील संवादांद्वारे आपल्यासमोर सादर होते. ग्रामीण जीवनाचे सगळे रंग अगदी अनोख्या पद्धतीने हाडवळे यांनी चित्रपटात भरले आहेत. चित्रपटातील भाषा ही माझ्या गावाकडची बोलीभाषा

चित्रपटातल्या अगदी छोट्या छोट्या स्ंदर्भातून ग्रामीण जीवनाचा पोत उलगडत जातो. ट्रॅक्टर आणायला बहिणीकडे गेलेला गेलेला बाप घरी येताना फक्त केळीचा एक घड घेऊन परत येतो. हे दृश्य अगदी आतपर्यंत हलवून टाकणारे आहे. वांझोटेपणाचा शाप मिळाल्याने सवतपण भोगावे लागणारे त्याची बहीण, सवत आल्याने तिला कुटुंबात काहीही स्थान राहिलेले नाही. मात्र तिच्या मायेचा झरा आटलेला नाही. हे सगळे संदर्भ केवळ एका छोट्याश्या दृश्यातून व्यक्त होतात.

चित्रपटाच्या सुरुवातीला हातात बॅटसारखे दिसणारे एक फळकूट घेऊन नाचत येणारा टिंग्या. बटणं नसल्याने मागे उडणार्‍या शर्टातून दिसणार्‍या त्याच्या बरगड्या हे दृश्य असेच मनावर ओरखडा उमटवणारे आहे. टिंग्याचे कुपोषित शरीर आणि त्याच्या हातातली बॅट याला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो.

'तिन्ही सांजेला उंबर्‍यावर बसू नये. ही लक्ष्मीची यायची वेळ असते.' या आईच्या प्रश्नाला 'लक्ष्मी म्हणजे काय आई?" या टिंग्याच्या उत्तर नसलेल्या प्रश्नाचे दृश्यही असेच.

खड्ड्यात पडलेल्या बैलाला बाहेर काढण्याचा प्रसंग काय किंवा बैल विकल्यानंतर घुंगराचा पट्टा स्वतःच्या गळ्यात घालून येणारा टिंग्या काय किंवा शेवटचा क्षण जवळ आल्याने अहेवपणाचे सगळे दागिने घालून आता शांतपणे मृत्यूची वाट पाहणार्‍या नानीच्या मृत्यूचा प्रसंग काय. हा सगळा चित्रपटच असा अगदी आतपर्यंत ढवळून आणणारा आहे.

ंटिंग्याचं काम करणारा शरद गोयकर हा मुलगा तर अफलातून. अनेक किंग, सुपरस्टार, हार्टथ्रॉब इत्यादी मंडळींनी त्याचे पाय धूवून पाणी प्यावे. या मुलाचे विलक्षण बोलके डोळे, गलबलून टाकणारं रडणं, शरीराचे हावभाव आणि बोलीभाषेतील संवाद हे केवळ अवर्णनीय आहेत. चित्रपटात असलेलं 'माझं आभाळ तुला दे हे असंच अत्यंत थोर गाणं आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला टिंग्याचा अवखळपणा, निरागसता अधोरेखित करणारं हे गाणं चित्रपटात नंतर वेगवेगळे अर्थ घेऊन समोर येतं.


टिंग्या हा एक हादरवून टाकणारा अनुभव आहे. एका लहान मुलाचे आपल्या बैलावर असलेले प्रेम आणि परिस्थितीमुळे तो बैल कसायाला विकावा लागत असल्याने त्या मुलाचे कोसळत जाणारे निराग भावविश्व, केवळ हाच चित्रपटाचा विषय नाही. जागतिकीकरणामुळे ढवळून निघणार्‍या आपल्या समाजात होणारे बदल, या बदलांशी जुळवून घेण्याची संधीच न मिळाल्यामुळे एका वस्तीतील कुटुंबाची होणारी ससेहोलपट. परिस्थितीशी अपरिहार्यपणे, निमूटपणे चाललेला त्यांचा लढा. अशा परिस्थितीत देखील आपला आत्मसन्मान न गमावता उभे राहण्याचा प्रयत्न. आयुष्याच्या रखरखाटातही मायेचा ओलावा न गमावण्याची त्यांची वृत्ती. साध्या सोप्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा समजूतदारपणा. या सर्व गोष्टी चित्रपटातून ठळकपणे सामोर्‍या येतात.

विकासाच्या लखलखाटामुळे आपले डोळे इतके दिपले आहेत की अशा यातना भोगणारे अनामिक आपल्याला आता दिसतच नाहीत. आपण अद्यापही जिवंत असलो तर निदान हा चित्रपट पाहून त्यांच्या परिस्थितीच्या जाणीवेने अशांत व्हावे. आपल्याच आयुष्याबाबतची आपली समज वाढवून घ्यावी इतकी अपेक्षा करणेही फार होईल.

Sunday, April 6

गुढीपाडवा शुभेच्छा


गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांना नवे वर्ष सुखसमृद्धी भरभराटीचे जावो.

Wednesday, April 2

दिल्ले दान... घेतले दान...

आमचा लाडका वगैरे सुपरष्टार शेतकरी असल्याचे जाहीर झाले आणि 'सत्यमेव जयते' नुसार अखेर सत्याचा विजय झाला. (कोण रे तो भिखू म्हात्रेचा सत्या म्हणतोय? सुपरष्टारच्या कलागुणांची कदर नाही त्याला! ठेचा साल्याला!)

डोक्याला मुंडासे बांधून सुपरष्टार बैल हाकणार. जयावैनी डोईवर भाकरी न भाजी घेऊन मळ्यावर येणार, नाजूक लाडकी ऐशू उन्हातान्हात पिकाचं राखण करणार, गोफण घेऊन अभिषेक दगडं मारणार आणि पाखरांना बुजवण्यासाठी अमरसिंगजी बुजगावणं म्हणून शेतात उभं राहणार या विचारांनी कंठ अवरुद्ध झाला आणि श्वास घेता येईनासे झाले. टाय सैल केला तेव्हा कुठे बरे वाटले!

चित्रपट पाहणार्‍या अवघ्या देशाचा 'आयकॉन' असलेले अमितशेठ आता शेतकर्‍यांचेही आयकॉन होणार आणि अमिताभचं खत, अमिताभचं बेणं बियाणं, अमिताभची कीटकनाशकं यांचा खप सर्वत्र वाढणार याची खात्रीही झाली. गेला बाजार आत्महत्या करण्यासाठी तरी शेतकरी 'रीड अँड टेलर' चे सूत वापरलेले दोरखंड वापरतील आणि त्यांच्या जीवनाचा नाही तर निदान मृत्यूचा दर्जा तरी उंचावेल या विचाराने समाधान पावलो.

एखाद्या सकाळची वेळ - किंवा मंगलप्रभात म्हणूया - होती. कोंबड्याने तिसरी बांग दिली आणि वेळेबरहुकूम भारनियमन सुरू व्हावे त्याप्रमाणे आकाशातल्या चांदण्या विझल्या आणि काजळी साचलेल्या कंदिलातील प्रकाशाप्रमाणे लालसर पिवळा प्रकाश पूर्वेकडे दिसू लागला. परसाकडे गेलेले अमितशेठ अजूनही घरी न आल्याने जयावैनींना काळजी वाटू लागली होती. वयोमानानुसार अमितजींना वेळेवर 'होत' नसे. थोडा जास्तच वेळ लागत असे. आणि 'इसबगोल' घ्या म्हटलं तर डाबरच्या उत्पादनांची जाहिरात करतो आणि इसबगोल घेतलं तर व्यावसायिक नीतीमत्तेचं काय होईल असं काहीसं अमितशेठ बोलून गेले होते. आयुष्यभर पर्वा न केलेल्या नैतिकतेचं गळू अमितशेठना आताच कसं झालं या काळजीनं जयावैनींना पोखरलं होतं. नाहीतरी उतारवयात विस्मरण होतंच म्हणा. फिल्मी आयुष्य आणि खरे आयुष्य यात गल्लत होतेच. चित्रपटातील संवाद चुकून बोलून गेले असतील या भावनेनं त्यांना काडीचा आधार दिला. मात्र हे शेतकर्‍याचं जीवन जगताना त्या पुरत्या वैतागल्या होत्या.

अंबाड्याच्या भाजीला ऐशूने टाकलेल्या लसणीच्या फोडणीचा चर्र असा आवाज झाला आणि जयावैनी तंद्रीतून जाग्या झाल्या. कोनाड्याजवळ अभिषेक उभा होता. सकाळपासून तीन वेळा दाढी करण्याच्या प्रयत्नात कापून घेतल्यामुळे त्याने 'ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्त असू द्यावे समाधानी' या उक्तीनुसार दाढी करण्याचा नाद आता सोडून दिला होता. त्याऐवजी दाढी खाजवण्याचे काम सुरु झाले होते. मात्र आपण उजव्या हाताने दाढी खाजवत आहोत आणि बाप तर डावखरा आहे हे त्याच्या अचानक ध्यानात आले आणि कोणाचे लक्ष नाही असे वाटून त्याने झटकन हात बदलला. तरी ऐशूने हे पाहिलेच आणि नाराजीने नाक मुरडले. बिच्चारा अभिषेक खजील झाला!

सुपरष्टार 'काम' आटोपून घराकडे येताना दिसत होते. मागोमाग हातात लोटा घेऊन अमरसिंगजीही होते. अंगणात आल्यावर अमरसिंगजींनी बंबाची राख घेऊन (स्वतःचे) हात खसाखसा धुतले आणि सुपरष्टारच्या पायावर पाणी ओतले. सुपरष्टार आत आल्याआल्या जयावैनी सुरू झाल्या.

'काय हे मानूस म्हनायचं का सोंग? पुरता वैताग आला मला आता.'
'अगं.'
'चला बगू परत 'जलसा' ला इथं मला जमत नाही. चुलीच्या धुरानं डोळ्याचा धबधबा झाला पार!'
'अगं पन.'
'ते काही नाही. चला म्हंते ना!'
'तू जरासंक ऐक तरी!'
'काय जगनं म्हनायचं का काय हे. सकाळी उठल्यावर शेनाने सारवून घ्या. बंब पेटवा. दुपारच्याला टकुर्‍यावर टोपली घेऊन उन्हातान्हात शेतात जा.'
'अगं जरा समजून घे.'
'शेती करन्यासाठी आपल्याकडं साधनं तरी हायेत का? बैल पन एकच आहे.'
ऐशूने चमकून अभिषेककडे पाहिलं. नेहमीप्रमाणे त्याच्या बथ्थड डोक्याला काही समजलंच नाही.
’आता, बैल मागवलेत की तिकडून. आनी बैलांस्नी म्हराटी यायला पायजेल असं कोनी म्हनू बी शकत न्हाई ना.’
’अहो पर मानसान्ला कुठेबी राहायची परवानगी अस्ते. पन बैलान्ला असते असं बैलांच्या बद्दल राज्यघटनेत लिव्हलेलं हाये का?’
'हे बघा कारभारनी. तुमच्या डोक्यात अक्कल कमी असं आम्ही म्हनून गेलोय ते काही खोटं नाही.'
'ऑ? आता काय झालं. चांगला मुंबईतला बंगला सोडून हितं घानीत राहायचं दळभद्री लक्षन तुम्हास्नी सुचलं तर तुम्ही शहाने आनी आम्हाला अक्कल न्हाई व्हय.'
'अहो, आता कसं सांगू.'
'काय ते'
'थोडं गप्प बसाल तर आम्ही बोलनार ना.'
'बोला की. म्या काय त्वांड धरलंय काय तुमचं!'
'अगं, सरकारनं शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्याली हाये. आता आपन बी शेतकरी न्हाई का? मग? अभिषेकच्या लग्नाचा सम्दा खर्च आता हिकडून वसूल करता येईल बग. अमरसिंगजी काहीतरी इल्लम काढतीलच. काय अमरसिंगजी?'
'व्हय तर.'
'हांग्गाश्शी. मातुर येच्यासाठी आपल्याला थोडी कळ काढायला लागंल. घुसलं का आता टकुर्‍यात!'
’आता गं बया! व्हय व्हय. आता कुठं समजलं’

बापाच्या अचाट बुद्धीची ही युक्ती ऐकून अभिषेक अवाक झाला आणि आश्चर्याने तोंडात घातलेले बोट उजव्याच हाताचे आहे याचे त्याला भानही राहिले नाही!

व्यंगचित्र सौजन्य desicartoonist.blogspot.com

Thursday, March 20

'समुद्रापारचे समाज' विषयी

विकासाच्या आणि समृद्धीच्या पारंपारिक कल्पना, जागतिकीकरण, जातीभेद अशा अनेक विषयांबाबतचे आपले पूर्वग्रह अतिशय बळकट असतात त्यामुळे काही गोष्टी दिसत असूनही आपण न पाहिल्यासारखे करतो तर कधीकधी 'मोडेन पण वाकणार नाही' अशा दुराग्रही निगरगट्टपणाने त्यांचे समर्थन करत राहतो. कारण कोणीतरी आपल्या पूर्वग्रहांना गदगदा हालवावे, विचार करण्याची पद्धतच बदलवून टाकावी असे शक्यतो होत नाही. बोकीलांचे 'समुद्रापारचे समाज' हे पुस्तक वाचले आणि एक नवी दृष्टी लाभल्यासारखे झाले. मनाची जळमटलेली कवाडे खुली होऊन मोकळा श्वास घेता येत आहे असे वाटू लागले.

'समुद्रापारचे समाज' विषयी खूप वाचले होते. मात्र बरेच दिवस ते पुस्तक मिळाले नाही. पुण्यातील एका दुकानदाराने तर ते ’मुंबईच्या प्रकाशनाचे पुस्तक आहे. आणि आम्ही त्यांची पुस्तके विकत नाही.’ असे सांगून मला वाटेला लावले होते. पण शेवटी एका प्रदर्शनात ते गावलेच. ;)

पुस्तकाविषयी काही सांगण्याआधी बोकीलांविषयी थोडेसे सांगणे आवश्यक आहे. बोकील यांचे शिक्षण मुळात इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनीअरिंग या विषयातले. असे असले तरी तरूणवयात काही आंदोलनांशी संबंध आल्यावर त्यांना समाजशास्त्राचा आणि मानववंशशास्त्राचा विद्यापीठीय चौकटीत अभ्यास करण्याची प्रेरणा निर्माण झाली. या अभ्यासाने त्यांच्या एकूणच लेखनाला प्रगल्भ आणि शास्त्रीय समज प्राप्त झाली आहे. याचबरोबर त्यांची जडणघडण वैचारिक आंदोलनांमध्ये झालेली असल्याने त्यांच्या कोणत्याच लेखनात केवळ शास्त्रीय कोरडेपणा नसतो तर त्या प्रश्नाची मुळापासून आस्था असल्याने त्या प्रश्नाशी असलेली त्यांची बांधीलकी त्या लेखामध्ये जाणवत राहते.

या पुस्तकात बोकील यांनी दुर्लक्षित परदेशीय समाजांच्या जीवनाबद्दल वेगवेगळ्या दिवाळी अंकात लिहिलेले लेख संकलित केलेले आहेत. दिवाळी अंकात येणार्‍या नेहमीच्या पद्धतीच्या लेखांपेक्षा हे लेख अतिशय वेगळ्या प्रकारचे आहेत. बोकीलांची समाजजीवनाकडे, समृद्धीकडे, भौतिक प्रगतीकडे पाहण्याची वेगळी दृष्टी, त्याला पूरक असा त्यांचा मानववंशशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि अतिशय सुंदर भाषाशैली यामुळे हे लेख अभ्यासपूर्ण असले तरी बोजड नाहीत.

फिलिपीन्सच्या उत्तरेकडच्या इफूगाओ प्रांतातले आदिवासी , समाजकार्य करणारा बैरॉईटमधील एक समूह, अमेरिकेच्या वळचणीला वसलेला लहानसा कोस्टा रिका, ऍमस्टरडॅम आणि थायलंडमधील देहविक्री करणारे व्यावसायिक, वर्णभेदाने दुभंगलेला झिम्बाब्वे आणि जपानमधले दलित. अशी लेखांच्या विषयात विविधता असली तरी प्रत्येक लेखातून एक समाजशास्त्रीय समान तत्त्व काढण्याच्या उद्देशाने त्यांनी त्या त्या प्रदेशातील परिस्थितीची तुलना भारतातील परिस्थितीशीही केली आहे. त्यामुळे हे लेख समजायला सोपे तर जातातच शिवाय ते मनाला भिडतातही.

पुस्तकातील काही लेखांमधून आदिवासी समजल्या जाणार्‍या समूहांच्या जीवनशैलीशी ओळख होऊ लागते. आपण ज्यांना आदिवासी किंवा तथाकथित मागास समजतो अशा समूहांची जगभरातील जीवनपद्धती किती समृद्ध आहे. हवा-पाणी-जमीन यांवर कमीतकमी अत्याचार होतील अशा पद्धतीने एकमेकांस मदत करून सुसंस्कृत जीवन जगण्याची त्यांची धडपड चालूच आहे. बाहेरच्या जीवघेण्या स्पर्धेला, त्यांच्यावर होणार्‍या सांस्कृतिक आक्रमणाला तोंड देतानाही या समूहांनी शांततामय जीवनाचा मार्ग सोडलेला नाही. या पार्श्वभूमीवर ज्याला आपण प्रगत समाज म्हणतो अशा समाजातील असंस्कृतपणा, ओरबाडून घेण्याची वृत्ती, स्वार्थीपणा ह्या गोष्टी बटबटीतपणे पुढे येऊ लागतात.

पुस्तकातील ऍमस्टरडॅम आणि अमेझिंग थायलंड या लेखांमधून लैंगिक व्यवसायांसाठी प्रसिद्ध असणार्‍या या पर्यटनस्थळांमध्ये चाललेल्या लैंगिक शोषणाबद्दल बोकीलांनी लिहिले आहे. या व्यवसायात एकूणच जीवनव्यवहाराचा प्रत्येक भाग असलेली गोष्ट 'खरेदी-विक्री करून पैका करण्याची वस्तू' मानणे. मानवी शरीराला पशूपेक्षाही हीन पातळीवर उभे करून या सर्व गोष्टींचा बाजार 'आधुनिक समाज' या नावाखाली चालवणे या गोष्टी पाहून बोकील अस्वस्थ होतात.

कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय समाज अशी वर्णभेदी व्यवस्था हे खरे तर युरोपियन वसाहतवादाचे फळ. अगदी कालपरवा प्रसिद्ध झालेल्या नॅशनल जिओग्राफिकच्या लेखामध्येही हेच अधोरेखित केले आहे. 'झिम्बाब्वे काळा की गोरा' आणि 'जपानमधील दलित' या लेखांमध्ये हीन समजल्या जाणार्‍या समाजघटकांबद्दल बोकीलांनी लिहिले आहे. कोणताही घटक समाजव्यवस्थेमध्ये हीन कसा ठरत जातो हे उलगडून सांगतानाच ही हीन ठरवण्याची पद्धत स्थल-काल-संस्कृतीनिरपेक्ष - अगदी सर्वत्र - सारखीच कशी आहे हेदेखील बोकील अधोरेखित करतात. एकदा एखाद्या समूहाला हीन ठरवले की नंतर त्या समूहाच्या प्रगतीच्या वाटा बंद करण्याच्या पद्धतीही सर्वत्र कशा सारख्याच आहेत हे देखील बोकील विस्ताराने समजावून सांगतात.

प्रत्येक लेख त्या त्या विषयाचा बोकीलांनी केलेल्या अभ्यासाची खात्री तर पटवतोच पण वाचकालाही अस्वस्थ करून सोडतो. 'मानवी समाजातील प्रकृती आणि विकृतीच्या कल्पना बदलत असतात' अशी बोकीलांची मार्मिक निरीक्षणे दाद घेऊन जातात. पुस्तकातील लेखन केवळ प्रवासवर्णनात्मक किंवा मनोरंजनात्मक उद्देशाने केलेले नाही. ह्या प्रवासात बोकीलांना आलेले अनुभव सांगतानाच त्या अनुभवांमागची कारणे मानववंशशास्त्रीय शोधण्याचाही बोकीलांचा प्रयत्न असतो.

वसंत पळशीकर यांची पुस्तकाला लाभलेली प्रस्तावना हा तर एका वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल. अनेक पुस्तकांच्या प्रस्तावना या ऋणनिर्देश, अर्पणपत्रिकेची पुरवणी पत्रिका इतक्याच मर्यादेत जातात, किंवा त्याचा उपयोग प्रस्तावना लिहिणारे लेखक समीक्षकी भाषेत त्यांचे ज्ञान 'मी कित्ती हुश्शार' पद्धतीने स्वतःभोवती आरती ओवाळण्यासाठी वापरतात. या पुस्तकाची प्रस्तावना मात्र लेखांप्रमाणेच वारंवार वाचावी, समजून घ्यावी अशी आहे.

शेवटी प्रस्तावनेतील काही भाग:

"ज्या व्यवस्थेत माणसाचा आत्मसन्मान,, त्याची प्रतिष्ठा या गोष्टी राखल्या जातात, माणुसकी जपली व संवर्धित केली जाते, स्त्री पुरुष हा भेद विषमतेसाठी, शोषणासाठी केला जात नाही, जेथे व्यक्ती स्वतंत्र व समान आहे, जेथे पृथ्वीच्या पर्यावरणीय व्यवस्थेचा आदर केला जातो, पर्यावरणाची जपणूक व संवर्धन केले जाते, जेथे मानवी लोकसमूहांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली व संस्कृतींना सन्मानपूर्वक अवकाश राहिलेला असेल आणि जेथे माणसांमाणसांमधली नाती ही बंधुभावाची, आत्मीयतेची, एकमेका साह्य करण्याची असतील अशा एका नवसमाजाच्या निर्माणाचे ध्येय बोकील बाळगतात.हा त्यांचा पक्ष आहे. या अर्थाने आर्थिक विकास, प्रगती, आधुनिकता, समृद्धी यांची आज जी शिष्टमान्य प्रतिमाने वा धारणा आहेत त्यांना विकल्प शोधण्याच्या, निर्माण करण्याच्या, हे विकल्प रुजविण्याच्या पक्षातले ते आहेत. आर्थिक विकास, प्रगती, आधुनिकता, समृद्धी या सगळ्यांच्या परिणामी माणसांचे काय होते, जास्त सुसंस्कृत, प्रेमळ, नि:स्वार्थी, स्वस्थ, माणुसकीसंपन्न बनून एकमेकांशी ती नाती जोडतात की नाही हीच खरी मापनकसोटी आहे ही त्यांची धारणा असल्याचे लेखांमधून प्रकट होत राहते.

वाचकाचे मनोविश्व तसेच विचारविश्व समृद्ध व सखोल बनविणारे हे लेख ही वैचारिक साहित्यात एक मोलाची भर आहे."